नवी दिल्ली,
Paytm App : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करीत येत्या 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही खात्यात नव्या ठेवी स्वीकारू नयेत, असा आदेश दिला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच कंपनीने महत्त्वाचा खुलासा केला आहे. पेटीएम अॅप 29 फेब्रुवारीनंतरही कार्यरत राहील, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी स्वत: एक्सवर पोस्ट करून ग्राहकांना दिलासा दिला. तुमचे आवडते पेटीएम अॅप कार्यरत आहे आणि 29 फेब्रुवारीनंतरदेखील कार्यरत राहील. तुमच्या अविरत पाठिंब्यासाठी मी आणि पेटीएमची चमू तुमची आभारी आहे, असे विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे.
प्रत्येक अडचणीवर उपाय असतो. आम्ही सर्व प्रकारांच्या नियमांचे पालन करून देशातील ग्राहकांची सेवा करण्यास कटिबद्ध आहोत. आर्थिक सेवांमधील नावीन्यता व पेमेंट व्यवस्थेत भारत यापुढेही प्रगती करीत राहील आणि पेटीएम त्यात सर्वांत मोठे योगदान देईल, असे विजय वर्मा यांनी म्हटले आहे.