- इम्रान खान यांची खंत
इस्लामाबाद,
पाकिस्तानमध्ये फेब्रुवारीमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तसेच Imran Khan इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने (पीटीआय) संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानमधील निवडणूक घोटाळ्यावर भाष्य केले आहे. पाकिस्तानमध्ये इव्हीएम असती तर निवडणुकीत एवढा भ्रष्टाचार झाला नसता, असा दावाही कारागृहात असलेल्या इम्रान खान यांनी केला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा झालेले इम्रान खान हे सध्या अडियाला कारागृहात आहेत. येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तानची निवडणूक इव्हीएमवर झाली असती, तर कोणताही घोटाळा झाला नसता. सर्व निकाल अवघ्या काही तासांमध्ये समोर आले असते.
पाकिस्तानचा निवडणूक आयोग, काही राजकीय पक्ष आणि इतर संस्थांनी देशात इव्हीएम सुरू करण्याची योजना उद्ध्वस्त केली. नुकत्याच सार्वत्रिक निवडणुकीत सार्वजनिक जनादेश चोरणार्यांवर राजकीय पक्षाच्या नेत्यांवर देशद्रोहाखाली कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी Imran Khan इम्रान खान यांनी केली. सरकारला संकटात सापडलेली अर्थव्यवस्था हाताळणे अशक्य आहे. आर्थिक संकटात आपला पक्ष देश सोडून गेला हेही त्यांनी नाकारले. पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. मात्र, कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर सर्वाधिक जागा मिळवल्या पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने आघाडीचे सरकार स्थापन करण्यावर सहमती दर्शवली. शाहबाज शरीफ यांनी शनिवारी 3 मार्च रोजी पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान असतील. ते 72 वर्षांचे आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधानपद तीनवेळा भूषवलेले नवाज शरीफ यांचे ते बंधू आहेत.