रिसोड,
RESOD कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे शेतकर्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसून बाजार समिती प्रशासनाचे शेतकर्यांकडे दुर्लक्ष होत आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होत असते. शेतकरी आपला माल विकण्यासाठी बाजार समितीमध्ये आणत असतात. शासनाने शेतमाल विकण्यासाठी मोठमोठे शेड बांधून कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले. परंतु, या शेडमध्ये शेतमालाची विक्री करण्यासाठी शेतकर्यांना जागाच नाही. शेतकर्यांचा माल हा उन्हात, पाण्या पावसात रस्त्यावर असतो. शेतकर्यांसाठी शासनाने बांधलेल्या शेडमध्ये व्यापार्यांचा खरेदी केलेला माल भरलेला असतो त्यामुळे नाईलाजाने शेतकर्यांना आपला शेतमाल रस्त्यावर विक्रीसाठी टाकावा लागतो. शेतमाल रस्त्यावर टाकल्यानंतर त्याच रस्त्याने वाहनांची जाणे येणे चालू असते.
RESOD गुरे ढोरे यांच्यापासून शेतकर्यांना शेतमालाचे राखण करण्याकरता उन्हात बसावे लागते. या प्रकारे शेतकर्यांच्या समस्याकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे .विशेष म्हणजे बाजार समितीला सचिव नाही. सहायक सचिवाच्या देखरेखीखाली बाजार समितीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन शेतकर्यांना न्याय देण्यात यावा अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे.शेतकर्यांच्या समस्या संबंधी विचारणा करण्याकरता तरुण भारत चे प्रतिनिधी सहाय्यक सचिवास भेटण्याकरता गेले असता मला निवडणुकीची ड्युटी असल्यामुळे भेटण्यास वेळ नाही , असे उत्तर त्यांनी प्रतिनिधीला दिले.