- अंबादास दानवेंचा वाद संपला नसल्याचे संकेत
छत्रपती संभाजीनगर,
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यानंतर मी खैरे यांचे नव्हे, तर पक्षाचे काम करणार आहे, अशी प्रतिकि‘या देत Ambadas Danave अंबादास दानवे यांनी खैरेंसोबतचा वाद संपला नसल्याचे संकेत दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज खैरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावर दानवे म्हणाले की, सर्वांची मते जाणून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रभावी यादी आहे. पक्षप्रमुख जी काही जबाबदारी देतील, ती सर्व प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. मी खैरे यांचे नाही, तर पक्षाचे काम करणार असल्याचे दानवे म्हणाले.
दानवे म्हणाले की, मी इच्छुक होतो, 2014, 2019 आणि आताही निवडणूक लढवण्याची इच्छा होती. इच्छा असणे वावगे नाही. मात्र, मला पक्षाने विरोधी पक्षनेतेपद ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुखांचा आहे. वैयक्तिक हितापेक्षा संघटनेचे हीत महत्त्वाचे आहे. मी पक्ष प्रमुखांना आता फोन करून बोललो, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. चिंता नसावी. जोमाने पक्षाचे काम करू, असे त्यांना सांगितले आहे. इच्छा असताना उमेदवारी मिळाली नसल्याने थोडेफार वाईट वाटत असते. पण, जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती पूर्ण करेल, असे Ambadas Danave दानवे म्हणाले.