- काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली नाराजी
मुंबई,
Balasaheb Thorat : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली यादी जाहीर केली आणि महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली. सांगली आणि धारावीचा सहभाग मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्याबाबतीत अद्याप निर्णय झालेला नसताना, ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार जाहीर करणे, हे आघाडी धर्माला तिलांजली देण्यासारखे आहे. ठाकरे गटाने आघाडी धर्म पाळायला पाहिजे होता, अशी नाराजी काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आघाडीतील काही जागांवर अजूनही चर्चा सुरू असून, त्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही उद्धव ठाकरे गटाने अशाच अनिर्णित दोन जागांवर आपले उमेदवार जाहीर करून टाकणे योग्य नसल्याची खंत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते Balasaheb Thorat बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. आघाडी धर्म म्हणून काही गोष्टींची काळजी ही तिन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. मात्र, दुर्दैवाने अशा प्रकारची काळजी ठाकरे गटाने घेतली नसल्याचे दिसते, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. काही जागांचा आमचा आग्रह आहे आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत विश्वजित कदम दिल्लीला गेले आहेत. याबाबत आम्ही दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे. त्यामुळे विश्वजित कदम येथील वस्तुस्थिती कळवतील. या पृष्ठभूमीवर सध्या वादात असलेल्या किंवा तिढा नसलेल्या जागांवर परस्पर उमेदवर जाहीर करणे, हे आघाडी धर्माला धरून नाही, अशा शब्दांत थोरात यांनी ठाकरे गटाला फटकारले. दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ठाकरे गटाने अशी घाई केली नसती आणि चर्चेतून मार्ग काढला असता, तर ते आघाडीच्या दृष्टीने बरे झाले असते, असे शब्दांत सुनावले.