- प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची माहिती
मुंबई,
भाजपातर्फे राज्यात स्टार प्रचारकांच्या सभांसोबतच पक्ष संघटनेच्या शक्ती केंद्र पातळीवरील 21 हजार ‘नमो संवाद’ सभांचे आयोजन केले जाणार आहे. ‘नमो संवाद’ सभांच्या माध्यमातून भाजपाचे एक कोटी मतदारांपर्यत पोहोचण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस Vikrant Patil विक्रांत पाटील यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. 2014 पूर्वीचा भारत आणि आता मोदी सरकारच्या काळात घडलेल्या नवभारताचे तुलनात्मक चित्र सर्वसामान्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न यादरम्यान केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले .
Vikrant Patil : पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहीमेत राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होतील. त्यासोबत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी ‘नमो संवाद’ सभांचे आयोजन केले जाणार आहे. मतदानाच्या टप्प्यांनुसार या ‘नमो संवाद’ सभांचे वेळापत्रक बनवण्यात येणार आहे. 21 हजार शक्ती केंद्रांवर होणार्या या सभांमध्ये 300 पेक्षा अधिक वक्ते सहभागी होणार असून, दररोज 7 ते 8 सभा होणार आहेत. भाजपाचे विविध मोर्चे व प्रकोष्ठ यांच्या माध्यमातून फेरीवाले, व्यापारी, शिक्षक अशा समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागामध्ये ‘नमो चौपाल’, तर युवा पिढीशी संवाद साधण्यासाठी ‘कॉफी विथ युथ’ असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.