दीप्ती राखुंडे
(sadguru Gajanan maharaj) श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत. त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच म्हणावे लागेल. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. आजही भक्तांना काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. आरंभीच्या वेशानुसार त्यांच्या अंगात जुनी बंडी, हातात कमंडलूसारखा भोपळा आणि स्वहस्ते सिद्ध केलेली कच्च्या मातीची एक चिलीम होती. महाराज नेहमी एका मंत्राचा उच्चार करायचे तो म्हणजे 'गण गण गणात बोते'.त्यांच्या या मंत्राचा सोपा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.
आजानुबाहू दिव्य रूप
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, तुरळक दाढी आणि केस, तांबूस वर्ण, गुडघ्याना स्पर्श करणारे हात. घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती, अनवाणी पाय अशी महाराजांची देहरचना. झुणका भाकर, हिरव्या मिरच्या, मुळ्याच्या शेंगा तसेच पिठीसाखर महाराजांचे अतिशय आवडते पदार्थ. (sadguru Gajanan maharaj) विशेष म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. साखरेने भरलेली वाटी असतो की मिरचीचा गोळा महाराज प्रसन्न भावाने त्याचे सेवन करत असे. म्हणूनच आजही गजानन महाराजांच्या महाप्रसादामध्ये पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले तसेच अंबाडीची भाजी अवश्य केली जाते.
छायाचित्रकांरांची दमछाक करणारे महाराज
गजानन महाराजांचे फोटो फार कमी उपलब्ध आहे. त्यामागील कारणही गमतीशीर आहे. असे म्हणतात महाराजांना फोटो काढायला अजिबात आवडत नसे. त्यांचे खरे रूप त्यावेळी कोणताही छायाचित्रकार टिपू शकला नाही. उपलब्ध असलेल्या प्रत्येक फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे काढलेले प्रत्येक छायाचित्र सारखे नाही. म्हणून महाराजांचे सर्व छायाचित्र एकमेकांशी जुळत नाही.
वेद आणि ऋचा यांचा दांडगा अभ्यास
दासगणूंच्या श्री गजानन विजय ग्रंथाच्या ८ व्या अध्यायामध्ये महाराजांनी ऋचांचे पठण केले आहे. असे म्हणतात गजानन महाराजांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत यासारख्या अनेक भाषा अवगत होत्या. वेद आणि ऋचा यांचाही दांडगा अभ्यास असल्याने अनेकांना महाराजांनी भुरळ घातली होती. (sadguru Gajanan maharaj) केवळ भाषांचं नाही तर वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान अवगत असल्याने खरा जिज्ञासू समोर आल्यास त्याची जिज्ञासा त्यांच्याकडून शमवली जात असे. याशिवाय कला-संगीत यांचीही महाराजांना आवड होती. अनेकदा ते विविध रागात स्वतः भजने आणि पदे म्हणत असल्याच्या नोंदी आहेत.
दांभिकतेचा होता तिरस्कार
श्री गजानन महाराजांनी कर्म, भक्ती आणि योग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करुन देतात असे सांगितले. महाराज हे ब्रम्हज्ञानी, महानयोगी, भक्तवत्सल्य असून त्यांना दांभिकतेचा फार तिरस्कार होता. (sadguru Gajanan maharaj) विठोबा घाटोळ नावाच्या सेवेकऱ्याने महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना अंगात आल्याचे नाटक करून फसविण्याचा प्रकार सर्वश्रुत आहे. तेव्हा महाराजांनी त्याला काठीने चांगलेच बदडून काढले होते. भक्तांसाठी गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते.
स्वामी समर्थ आणि गजानन महाराज
गजानन महाराज आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्यामध्ये अनेक प्रकारे साम्य दिसून येतात. दोघेही परमहंस सन्यासी तसेच आजानबाहू होते. दोघेही अत्यंत गूढ बोलत. (sadguru Gajanan maharaj) अशी मान्यता आहे की, गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्त होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. तसेच या दोन महापुरुषांची भेट झाली, असे अनेकांचे मत आहे. स्वामी समर्थांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते.
पंढरपुरात समाधी घेण्याचा मानस अन्
गजानन महाराजांना पंढरपुरात समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याची मान्यता आहे. ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. (sadguru Gajanan maharaj) १९६७ पासून गजानन महाराज पालखी माध्यमातून गजानन महाराज खेड्या- पाड्यापर्यंत पोहोचले. विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे.
आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला. कारणपरत्वे महाराजांनी अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव , रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या ठिकाणीही भ्रमंती केली. (sadguru Gajanan maharaj) वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने ‘गजानन बाबा’ म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, “मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||. ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.
गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।। या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवीत राहायाते ।।
हे स्तोत्र नसे अमृत ते । मंत्राची योग्यता याते ।। हे संजीवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते
॥ जय गजानन ॥