तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
Uddhav Thackeray महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता जय्यत तयारी करण्यात आली. शरद पवार राकाँचे नेते शरद पवार आणि उबाठा गटाचे उद्धव ठाकरे येथे आले. मोदी विरोधी भाषण ऐकण्यासाठी कानं टवकारले होते. शरद पवार यांनी अवघ्या 4 मिनिटांत मोदी सरकारवर टीका करत भाषण आटोपते घेतले. त्यानंतर उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही 5 मिनिटांत भाषणाला पुर्णविराम दिल्याने भाषणाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्यांचा हिरमोड झाला.
महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरदचंद्र पवार राकाँचे अध्यक्ष शरद पवार, उबाठाचे उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आपचे नेते संजयसिंह, अॅड. सुधीर कोठारी, अतुल वांदिले आदींची उपस्थिती होती. Uddhav Thackeray यावेळी पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या धोरणा विरुद्ध टीका केली म्हणून केजरीवाल यांना मोदींनी कारागृहात टाकून एका वेगळ्या प्रकारच्या हुकूमशाहीची झलक दाखवून दिली. या विरुद्ध आपल्याला लढायचे आहे. मोदी सरकार डॉ आंबेडकर यांची घटना बदलविण्याच्या मागे आहेत. परंतु, असे झाल्यास हा हिंदुस्थान पेटून उठेल असा इशारा त्यांनी दिला. पुढील सभेसाठी त्यांना अलिबागला जायचे असल्याने त्यांनी केवळ तीन चार मिनिटात आपले भाषण आटोपते घेतले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकून हिंदुत्व जगात बदनाम केले. आमचे चिन्ह दुसर्याला देऊन आमच्यावर अन्याय केला आहे. या अन्यायचा बदला तुम्ही काळे यांना निवडून आणून घ्या असे आवाहन त्यांनी केले. जनतेची इच्छा उद्धव ठाकरे यांचे भाषण एकण्याची होती. परंतु मामा भाच्यानी लांब लचक भाषण केल्याने उद्धव ठाकरे हे नाराज झाल्याचे त्यांच्या देहबोली वरून दिसून येत होते. उमेदवार अमर काळे यांचे लांबत चाललेले भाषण आवरते घेण्यासाठी कोणीतरी त्यांना चिट्ठी दिली.ईडीचा धाक दाखवून आपल्या पक्षात घेऊन पावन करीत आहेत असा आरोप आपचे दिल्ली येथील खा. संजय सिंग यांनी केला. शेतकर्यांचे उत्पन्न दुपट्ट करू असे सांगणारे मोदी यांनी शेतकरी वर्गच्या आत्महत्या दुप्पट केल्याचा आरोप, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. संचालन माजी आमदार राजू तिमांडे व अॅड. सुधीर कोठारी यांनी केले.