- आशिष शेलार यांचा कवितेतून सवाल
मुंबई,
काँग्रेसचा जाहीरनामा मातोश्रीच्या खिडकीत उभे राहून वाचा... बघा हिंदुत्वाची आठवण येते का? अशा खोचक शब्दांत कवी सौमित्र यांच्या ‘मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा, बघ माझी आठवण येते का?’ या कवितेच्या चालीवर आधारीत विडंबनात्मक कवितेच्या माध्यमातून मुंबई भाजपा अध्यक्ष Ashish Shelar आशिष शेलार यांनी पुन्हा उबाठा गट आणि उद्धव ठाकरेंना सवाल केला.
विडंबनात्मक कविता
Ashish Shelar : काँग्रेसचा जाहीरनामा मातोश्रीच्या खिडकीत उभे राहून वाचा...
बघा हिंदुत्वाची आठवण येते का?
जूने सामनाचे अंक काढा... वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे अग्रलेख वाचा... नाहीच काही जाणवले, तर बाहेर पडा... हवं तर शिवतिर्थावर जा...
बघा हिंदुत्वाची आठवण येते का?
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात तुकडे तुकडे गँगचा अजेंडा दिसेल, देशाच्या मालमत्तांवर पहिला अधिकार जादा बच्चेवाल्यांचा सांगेल... आपल्या आया-भगिनींचे मंगळसूत्रही उद्या मागेल... वाळू सरकेल पाया खालची...
बघा, हिंदुत्वाची आठवण येते का?
यानंतर देशाचा आवाज नुसता ऐकण्याचा प्रयत्न करा... यानंतर सताड डोळ्यांनी काँग्रेसचे काय चालले हे बघा... मुंबईकरांना नाही तर तुम्हीच तुम्हाला फसवताय् याची जाणीव होईल... मशालीच्या धगीत... झोपी जाण्याचा प्रयत्न करा... झोप येणार नाहीच... हवं तर हनुमान चालीसा म्हणा...! आई भवानीची शपथ... या निवडणुकीत... एक दिवस तरी... बघा... हिंदुत्वाची आठवण येते का!