- हवामान खात्याचा इशारा
मुंबई,
महाराष्ट्रातील ठाणेे, रायगड आणि मुंबईच्या काही भागात 27 ते 29 एप्रिल दरम्यान Heat wave उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. ठाणे, रायगड आणि मुंबईच्या काही भागांत चक्रीवादळ विरोधी अभिसरण निर्माण होत असून त्यामुळे या भागात 27 आणि 28 एप्रिल दरम्यान उष्णता सर्वाधिक वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी आज दिला.
मुंबई आणि परिसरात Heat wave उष्णता वाढीबाबतचा या महिन्यातील हा दुसरा इशारा आहे. 15 आणि 16 एप्रिलला मुंबई आणि परिसरातील नागरिकांनी उष्ण हवामानाचा अनुभव घेतला होता. तेव्हा नवी मुंबई भागात पारा 41 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. 27 ते 29 एप्रिल दरम्यान पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात जास्त वेळ काम करणे टाळावे, जास्त पाणी प्यावे, हलक्या रंगाचे सैल आणि सुती कपडे घालावे, घराबाहेर जाताना डोक्याला बांधावे किंवा छत्रीचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत.