- शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका
पुणे,
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणेकरांना माझा नमस्कार, अशी भाषणाला सुरुवात करतील आणि तिसर्यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याची साद घालतील. मात्र, त्यांना देशाच्या विकासासाठी नव्हे, तर संविधान बदलण्यासाठी तिसर्यांना पंतप्रधान व्हायचे आहे. त्यासाठीच लोकसभेत चारशे जागा हव्या असल्याची टीका Sharad Pawar शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेतून केली.
बारामती मतदारसंघातील सासवड येथील पालखी मैदानावर रविवारी आयोजित जनसभेत बोलताना ते म्हणाले, मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. आठ महिन्यांपूर्वी माझ्याबद्दल त्यांचे वेगळे मत होते. मात्र, आमाच्यातील काही लोक त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली.
Sharad Pawar : मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात, त्याबाबत चिंता आहे. महापालिका, पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूक झाल्या नाही. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेतली जाते. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. जनतेने त्यांच्या मनातील समजून घ्यायला हवे. संविधान बदलण्यासाठी कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी चारशे पारचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे.
हुकूमशाही प्रवृत्तीला बाजूला सारा
सध्याचे सरकार हुकूमशाहीच्या मार्गावर निघाले आहे. ते देशातील लोकशाहीला संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. हुकूमशाही प्रवृत्तीला बाजूला सारण्याचे आवाहन पवार यांनी सभेतून केले. बांगलादेशसारखा देश जीडीपीत आपल्यापेक्षा पुढे असताना हे मात्र जनतेपुढे वेगळेच चित्र दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले ते भाजपासोबत गेले. आमच्या पक्षातील एकावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला. ते भाजपासोबत गेले. मात्र, आता त्यांच्यावरील आरोपांचे काय झाले ? याचे उत्तर भाजपाच्या नेत्यांनी द्यावे, असे आव्हान यावेळी त्यांनी केले.