तभा वृत्तसेवा
वर्धा,
Wardha Lok Sabha Constituency : वर्धा लोकसभा मतदार संघात शुक्रवार 26 रोजी शांततेत निवडणूक झाली. 6 मतदारसंघात 64. 85 टक्के मतान झाले. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी 3. 32 टक्क्यांनी मतदान वाढले. मात्र, महिला मतदारांची टक्केवारी घासरली आहे. शहरीभागापेक्षा ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत झाली. लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येण्याचे दावे दोन्ही उमेदवार करीत आहेत. मात्र, मतदारांचा नेमका कौल कुणाला मिळणार हे 4 जून रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कमळ फुलणार की तुतारी वाजणार यावर चौकाचौकात चर्चा सुरू असुन उमेदवारांनाही कार्यकर्ते आकडेमोड करून पटवून देत आहेत.
वर्धा लोकसभा मतदारसंघात 24 उमेदवार रिंगणात होते. मात्र, भाजपाचे खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाचे अमर काळे यांच्यात चुरशीची लढत झाली. महागाई, बेरोजगारी, शेतमालाला बाजारभाव आणि लोकशाहीला बळकट करण्याच्या मुद्यावर तर महायुतीने देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मते मागितली. मतदान होऊन 3 दिवस झाले. परंतु, मतदारांचा कौल कोणाला स्पष्ट होऊ शकले नाही.
राजकीय दावे-प्रतिदावे आता निवडून येण्याचे होत असून जातीय समीकरणाचे देखील जुळवा-जुळव करण्यात येत आहे. कार्यकर्ते प्रत्येक गावातून झालेल्या मतदानाचा आढावा घेत आहेत. मतदानाच्या दिवसांपासून तर मतमोजणीपर्यंत कोण निवडून येईल, याची वजा-बेरीज करून चर्चारंगत राहणार आहे.