नागपूर,
Baljagat बाल वयात मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी सुकळीकर कुटूंबियांनी स्वत:चा विचार न करता आयुष्यभर झोकून काम केले. तसेच बालसंस्कार केंद्र म्हणून बालजगतला लोकप्रिय केले आहे. बालजगतचा परिसर पूर्वी अस्तव्यस्त होता.मात्र आज बालजगतचे स्वरुप पूर्णत: बदललेले असून लक्ष्मीनगरची ओळख बालजगतमुळे झाली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सबऑर्डिनेट इंजिनीअर
असोसिएशनचे (एमएसईबी) माजी पदाधिकारी तसेच बालजगतचे माजी सचिव जगदीश सुकळीकर यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. बालजगत, लक्ष्मीनगरच्या प्रांगणात कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते जगदीश सुकळीकर व सीमा सुकळीकर यांचा शाल, श्रीफळ व एक लक्ष रुपयांचा सद्भावना निधी देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनेक संस्थेच्या पदाधिकार्यांनी सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश मीरा खडक्कार, नीला फडणीस, सीमा सुकळीकर उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गार्गी कवीश्वर हीने स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत दीपक खिरवडकर, श्रीकांत डहाके, अशोक शेवडे,ईरा दिघे, अनन्या दिघे यांनी केले. प्रास्ताविकात मीरा खडक्कार यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. सीमा सुकळीकर यांच्या मनोगताचे वाचन गौरी गिजरे यांनी केले. सत्काराला उत्तर देताना जगदीश सुकळीकर म्हणाले, 1991 मध्ये लावलेले बालजगतचे रोपटे आज एका विशाल वटवृक्षाप्रमाणे वाढले आहे. हीच बालजगतची मोठी उपलब्धी होय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुध्दा आपल्या बालवयात बालजगतमध्ये नियमितपणे यायचे. चांगले नागरिक घडविण्याचे कार्य बालजगतने करुन दाखविले आहे.Baljagat येथील विद्यार्थी देशविदेशात मोठया पदावर कार्यरत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. याप्रसंगी चंद्रकांत चन्ने यांच्यासह मोठया संख्येने बालजगतचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.