मनोरुग्णांना कुठल्याही स्वरूपातील दान द्यावे: राधेश्याम चांडक

    दिनांक :26-May-2024
Total Views |
बुलढाणा, 
Radheshyam Chandak : दानधर्माची परंपरा ही शतकानुशतके जुनी आहे. परंतु समाजात दातृत्वशक्तीचा अभाव दिसतोय.दान हे सत्पात्री व गरज असणार्‍यांना व्यक्तिंना दिले गेले पाहिजे. मग हे दान कुठल्याही स्वरूपातील असो. एखाद्याच्या कुवतीनुसार धान्य, कपडे, अन्नपदार्थ, पैसा आणि इतर अनेक वस्तू गरजूंना मूकपणे देऊन विसरणे याला दान म्हणतात. अशा दानाची खरी गरज दिव्य सेवा निवासी पुनर्वसन प्रकल्पातील मनोरुग्णांना असते. मदतीसाठी प्रत्येकानी पुढे यावे असे आवाहन बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक यांनी केले.
 
 
fkSJF
 
दि. 25 मे रोजी तहसील चौकातील प्राईड कॉम्प्लेक्स मधील दिव्य सेवा निवासी प्रकल्पाच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राधेश्याम चांडक यांच्यासह ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधवराव गरुड, अ‍ॅड. निलेश कोठारी, दिव्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे, ज्योती काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिव्यसेवा निवासी पुनर्वसन प्रकल्पाच्या जनसंपर्क कार्यालयाचे राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.
 
 
 
यावेळी राधेश्याम चांडक म्हणाले की, वरवंड येथील दिव्य सेवा निवासी पुनर्वसन प्रकल्प मनोरुग्णांचे पुनर्वसन करून त्यांना नवसंजीवनी देत आहे. या वेडसर, निराधार, मनोरुग्णांच्या सेवेत काकडे दांपत्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या या सेवाकार्याला आपणही थोडाफार हातभार लावल्यास निराधारांना आधार मिळू शकते.केवळ स्वत:पुरते न पाहता समाजातील दु:खीतांच्या जखमांवर फुंकर घालण्याची आज गरज आहे.दिव्या फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेला दिव्य सेवा निवासी पुनर्वसन प्रकल्पात आतापर्यंत 316 मनोरुग्णांचे पुनर्वसन झाले आहे. अंधारात चाचपडणार्‍या मनोयात्रींना प्रकाशवाट दाखविण्याचे काम अशोक काकडे व त्यांच्या पत्नी ज्योती काकडे ह्या करीत आहेत. सध्या प्रकल्पात शंभर मनोरुग्ण दाखल आहेत. त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी समाजाचा देखील हातभार आवश्यक आहे. दातृत्वाच्या भावनेतून प्रत्येकानी फुल् न फुलाची पाकळी म्हणून नव्याने उद्घाटित झालेल्या कार्यालयाशी संपर्क करून मदतीचा हात द्यावा, असे आवाहन राधेश्याम चांडक यांनी यावेळी केले आहे.