संत प्रबोधन
Saint Savata Mali : आपल्या कर्मातच ‘राम’ मानणारे संत म्हणजे संत सावता माळी होय. ‘अरण’ या गावातील रहिवासी असलेले संत सवतोबा आपल्या शेतमळ्यात राबणारे. तेथे बागायतीबरोबरच शांतिरूपी शेवंतीला त्यांनी फुलवले आहे. प्रेमरूपी जाईजुईला बहरविले आहे. असंख्य फुलांना फुलवत, भाजीचा मळा पिकवत आपल्या मळ्याला पाणी देत, भक्तीची मोट हाकत ते आपला भक्तीचा मळा सदैव फुलवतात.
आमची माळीयाची जात । शेत लावू बागाईत ॥
आम्हा हाती मोट नाडा । पाणी जाते फुल झाडा ॥
शांती शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥
सावताने केला मळा । विठ्ठल देखिला डोळा ॥
संत सावता माळी यांचा भक्तीचा मळा
Saint Savata Mali : भोवतालच्या या सर्व सृष्टीतील उपमाने वापरून, रूपक योजना करून सावतांनी आपल्या भक्तिप्रेमाने काव्याचा मळा फुलवला आहे. देवाजवळ मागण्यातही सावतांच्या शांत, समाधानी व्यक्तित्वाचा पडसाद या मळ्यामध्ये उमटलेला आहे. त्यांना उच्च प्रतीचे ज्ञान नको, मान पण नको. त्यांना भक्तीचा केवळ साधा भाव खूप आवडतो. त्यांच्या कर्मातच ते विठ्ठलाला भजतात आणि पूजतातसुद्धा. त्यांना विठ्ठलापासून काही नको आहे. ते म्हणतात,
नको तुझें ज्ञान नको तुझा मान ।
माझें आहे मन वेगळेची ॥
नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति ।
मज आहे विश्रांती वेगळीच ॥
चरणीं ठेउनि माथा विनवितसे सावता ।
ऐका पंढरीनाथा विज्ञापना ॥
Saint Savata Mali : संत सावतोबा म्हणजे सर्वत्र देव पाहणारे कष्टाळू संत. त्यामुळे सर्वत्र विठ्ठलाची प्रचीती त्यांना येते आणि म्हणूनच सदा सर्वदा समाधानी वृत्ती आणि शांत स्वभाव असा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तित्व व कवित्वात झालेला दिसतो. म्हणूनच त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये परमात्मा भगवंत दिसतो. त्यांना त्यांच्या मळ्यामध्येसुद्धा विठ्ठल चोहीकडे दिसतो. त्यांच्या जीवनात प्रत्येक आनंदाने भारावलेले क्षण ते आजुबाजूला शोधत असतात. त्यामध्ये विठ्ठल त्यांना दिसतो. त्यामुळेच त्यांच्या मळ्यामध्ये असणारी-
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥
सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥
सावतोबाच्या व्यक्तित्वातील समाधानी वृत्ती
संत सावता माळींच्या व्यक्तिमत्त्वात आध्यात्मिकतेच्या प्रवृत्तीसोबतच त्यांच्याशी सुसंगत अशी संयमित असणारी प्रेमळ स्वरूपाची भावनात्मक भक्तीची कोवळीक पाहायला मिळते. त्यांच्या अभंग रचनेची पृष्ठभूमी ही कोवळिकतेच्या व भावनात्मकतेच्या हिरवळीने व्यापलेली आहे.
संत सावता माळी यांचे जातिहिनतेचे दुःख
Saint Savata Mali : जसा गोरोबांच्या अभंगात जाती विचाराचा उल्लेख आहे, पण तो ओझरता, सूचक आणि सौम्य वाटतो. परंतु, सावता माळी यांच्या वाणीला मात्र यातिहिनतेचे म्हणजेच जातिहिनतेचे दुःख अधिक जाणवते. परंतु, त्यांनी हे दुःख गिळून टाकले आहे. यातिहीन अवस्थेत समाधान मानण्याची मनाची त्यांनी तयारी केली आहे.
भली केली हीन याति । नाही वाढली महंती ॥
स्नान नाहीं संध्या नाहीं । याति कुळ संबंध नाहीं ॥
सावता म्हणे हीन याती । कृपा करावी श्रीपती ॥
माळी समाजात जन्माला आलेले संत सावतोबा यांना यातिहिनतेचे दुःख सहन करावे लागले. परंतु, त्यांच्या कर्मातच त्यांनी भक्तीचा सुगंध शोधला आणि त्या आनंदात ते रममाण झाले होते.
संत सावता माळी भक्तीत तल्लीन होऊन जीवन जगले. जीवनाचा सिद्धांत मांडताना ते म्हणतात,
समयाशी सादर व्हावे । देव ठेवील तैसे रहावे ॥
संत सावता माळी यांचा संसार मळा
Saint Savata Mali : संत सावता माळी यांनी संसाराचा अवघा मळाच विठ्ठलमय करून टाकला होता. असे असले तरी केवळ त्यामुळे त्यांच्या सामाजिक संसाराची दुःखमयता, कष्टमयता नष्ट होईल, असे थोडेच झाले आहे. त्यांनाही देवाला जीवनातील दुःखमयता, कष्टमयता याबद्दल सांगावे लागले. यासाठी ते कुठल्याच आर्थिक क्रांतीचा किंवा सामाजिक उत्क्रांतीचा आश्रय घेत नाहीत. तर, वेगळ्याच परिमाणाचे पारमार्थिक जीवन ते जगतात. त्याठिकाणी वेगळ्या स्तरावर आपल्या भक्तीचा वापर करतात. कारण, ते सर्व गोष्टी ओळखून आहेत. सामाजिक आणि आर्थिक पातळीवर कितीही आणि कोणत्याही क्रांतीचा उल्लेख झाला किंवा प्रवेश झाला तरी संसाराची दुःखमयता नाहीशी होत नाही. ती आपल्यालाच आपल्या कर्माने संपवावी लागेल. आपल्या कर्मातूनच आपल्याला भक्तीचा मळा फुलवावा लागेल. याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच ते प्रत्येकाला संदेश देतात की, माणसाच्या दुःखमयतेवर आपल्या स्वतःचा कर्म सिद्धांतच उपयोगी पडेल. म्हणून ते विठ्ठलाला आपल्या मळ्यात प्रत्येक भाजीच्या स्वरूपात पाहतात.
करी संसाराची बोहरी । इतके मागतो श्रीहरी ॥
कष्ट करीता जन्म गेला । तुझा विसर पडला ॥
संसाराची ही आगळीवेगळी रित क्रांतीची कितीही आवर्तने जीवनामध्ये झाली तरी बदलणे शक्य नाही. माझा संसार मला स्वतःच यशस्वी करावा लागेल. सुखाचे मागणे संत कधीही देवाजवळ मागत नाहीत. कारण, माया आणि मोह यांनी व्यापलेल्या आणि काळाने ग्रासून टाकलेला हा संसार सदासर्वकाळ यशस्वी होणे शक्य नाही, हे ते कधीही विसरत नाहीत. म्हणूनच या संसारातून मला बाहेर काढ, असे संतांचे देवाजवळ नेहमी मागणं असते. सावतांनीही हे मागणे करुण रसामध्ये, वेदनेच्या भावामध्ये देवाजवळ मागितले आहे.
कोणे दिवशी बसून हत्तीवर ।
कोणे दिवशी पालखी सुभेदार ।
कोणे दिवशी पायांचा चाकर । चालून जावे ॥
कोणे दिवशी यम येती चालून ।
कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ॥
कोणे दिवशी स्मशानी जाऊन । एकटे राहावे ॥
संत सावतामाळी यांच्यावर विठ्ठल कृपा
Saint Savata Mali : प्रत्येकाला ईश्वरी कृपा व्हायला कबुली महत्त्वाची असते. माणसाच्या जीवनातील कबुली ही जेवढी सत्यत्व दर्शवणारी असेल, तेवढे देवाचे दर्शन अतिशय दृष्टिगोचर होत असते. संत सावतामाळी या कृपेला पात्र ठरलेले आहेत. सर्व सुखांचे सुख असे जे श्रीमुखकमळ आहे ते विठोबाचे मुख त्यांना साक्षात्काराची दृष्टी झाली आहे. हा त्यांचा आनंदाचा अनुभव वर्धित करताना त्यांची लेखणी कधी प्रेममय होते तर कधी विस्मयचकित होते. कधी आनंदाने उल्लेषित होते.
त्यांच्या जीवनातील आनंदाला पारावार उरत नाही. त्यांची लेखणी ही आनंदाने आनंद भावना विहरण करू लागते. त्यांना त्या परब्रह्म स्वरूप भगवंताचे साक्षात दर्शन होते.
तो आनंद वर्णन करताना ते लिहितात -
पैल पहा हो परब्रह्म भुलले ।
जगदीश का हो परतंत्र झाले ॥
काय सुख केले येणे नेणीजे ।
पूर्ण भाग्य गौळियाचे वर्णीचे ॥
आदी अंतू नाही जया व्यापका ।
पाया उखळी बांधीला देखा ॥
सर्व सुखांचे सुख निर्मळ ।
कैसे दिसताहे श्रीमुख निर्मळ ॥
योगिया उदय कमळीचे हे निधान ।
दृष्टी लागे जणी उतरा लिंबलोण ॥
सावत्या स्वामी परब्रह्मपुतळा ।
तनुमनाची कुरवंडी ओवाळा ॥
अशा कोमल भावनांची रम्य पखरण असलेला त्यांचा हा अभंग काव्य मधूर स्वरूपातील आहे. पांडुरंगाच्या भेटीच्या वेळी त्यांना पुन्हा या कोमल भावनांचे स्फूरण वारंवार होताना दिसते.
सावता माळी यांची भक्तिमार्गावरील श्रद्धा
Saint Savata Mali : संत सावतोबा यांची भक्तिमार्गातील अतूट श्रद्धा व्यक्त करण्याचा प्रसंग जेव्हा आला तेव्हा मात्र संत सावतांच्या कोमल वाणीला विलक्षण आवेश चढलेला दिसतो. केवळ नामाच्या बळावर, नाम भक्तीच्या बळावर या भक्तिभावाचा आस्वाद घेताना सावता नेहमीच वृत्तीने तन्मय होत असताना दिसतात. नामाचे सामर्थ्य वर्णन करताना संत सावता म्हणतात-
नामाच्या बळे न भिऊ सर्वथा ।
कळी काळाच्या माथा सोटे मारू ॥
केवळ नाम भक्तीच्या बळावर कळी काळालासुद्धा न भिणारे संत सावता माळी भक्तीचा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतात. सामान्य माळ्याच्या जातीतून पांडुरंगापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा हा निश्चय आगळावेगळा वाटतो. याच भक्तीतून साक्षात परमात्मा पांडुरंगाने त्यांच्या मळ्यात जाऊन त्यांना भेट दिली. त्या भेटीचा अवर्णनीय आनंद ते व्यक्त करतात. तो परमात्मा साक्षात्काराचा, त्यांच्या जीवन सार्थकतेचा अनुभव ते सर्व जगाला सांगतात की -
जाता मार्गी भक्त सावता तो माळी ।
आला तया जवळी पांडुरंग ॥
नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी ।
माळीया भितरी गेला देव ॥
माथा ठेवूनी हात केला सावधान ।
दिल्या आलिंगन चहुभूजी ॥
चरणी ठेवूनी माथा विनवितो सावता ।
बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥
या भक्तीमुळेच झाला, असा अनुभव ते सर्वांना सांगतात.
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
- 7588566400