कर्तृत्व शालिनी अहल्या बाई

31 May 2024 09:14:12
Ahilyabai Holkar Jayanti 
जिने संतती मानिली स्व प्रजेला ,जिने सौख्य सोयी दिल्या भारताला ,जरी दुःखिता तृप्ती देई दुजाला, नमस्कार माझा अहल्या सतीला ।।
 
 
Ahilyabai Holkar Jayanti
 
 
प्रचंड शक्तिशाली लाटा तोडण्या फोडण्याच्या उद्देशाने अव्याहतपणे किनाऱ्यावर आदळत असताना सागर जसा अविचल अभंग राहतो अगदी तसेच नियतीने उभ्या केलेल्या संकटांच्या डोंगराला उत्तम गुणांनी भुईसपाट करणारे व्यक्तिमत्व म्हणजे भारत वर्षातील एक देवता तुल्य स्त्रीरत्न ,लोकमाता पुण्यश्लोक देवी अहल्याबाई. महाराष्ट्रातील मराठवाड्यात चौंडे नावाच्या छोट्याशा खेड्यात माणकोजी शिंदे पाटलाच्या घरात १७२५ साली लोकोत्तर थोर कार्य करणाऱ्या अहल्येचा जन्म झाला. Ahilyabai Holkar Jayanti चुणचुणीत हुशार बारा वर्षांची ही पोर पेशव्यांच्या नजरेत भरली आणि त्यांनी त्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर यांना सून म्हणून करून घेण्याचा आग्रह केला. मल्हार रावांचा एकुलता एक पुत्र खंडेराव यांच्यासोबत अहल्या विवाहबद्ध झाली. खंडेराव मुळातच व्यसनी व बाहेर खयाली असल्याने अनुरूप जोडीदार किंवा सुखी संसार या कल्पना जीवनात प्रत्यक्षात कधी उतरल्याच नाहीत आणि म्हणूनच अहल्याबाईने स्वतःची ओळख ,स्वतःचा उल्लेख नेहमी सुभेदारांची सून म्हणूनच केलेला आढळतो .
 
पुत्राच्या दूरवरतनाने दुःखी असलेले पण सुनेचे सद्गुण लक्षात येतात मल्हारराव हेतू हेतूपूर्वक अहल्लेवर राज्याची महत्त्वाची कामे सोपवू लागलेत. ते स्वतः स्वारीवर असताना इंदूरची प्रशासन व्यवस्था अहल्याबाई कडेच असायची.कुंभेरीच्या लढाईवर असताना खंडेरावचा जीवन प्रवास संपला .त्या काळच्या परंपरेला तडा देत सती न जाता पतीचे दुःख मागे टाकून अहल्याबाई मल्हार रावांकडे राजकारण व सैनिकी प्रशिक्षण आत्मसात करून लागली .
 
पानिपतच्या दारुण पराभवामुळे डबघाईला आलेल्या मराठेशाहीला पुनः प्रतिष्ठित करण्यासाठी हिने दारूगोळा तयार करण्यात यश मिळविले.पुढे गोहाड चा किल्ला जिंकून पहिला विजय नोंदविला व मल्हार रावांकडून शाबासकी मिळविली .पतीप्रमाणेच पुत्राच्या बाबतीतही अहिल्याबाई दुर्दैवी होती.राज्यकारभार करताना अहिल्याबाईंना सासर्‍यांनी दिलेले शिक्षण ,प्रशिक्षण कामी आले. त्यांनी त्याच मुशीत आपल्या मुलालाही घडवले. Ahilyabai Holkar Jayanti मुलगा पराक्रमी असला तरी त्याच्या हातून एकदा अक्षम्य अपराध घडला. मुलगा मालोजीराव आपल्या रथातून जात असताना मार्गात एके ठिकाणी गाय आणि वासरू उभे होते .त्यांना पाहूनही मालोजीरावांनी रथ थांबवला नाही आणि वासरू रथाखाली चिरडले गेले व मालोजीराव न थांबता तिथून पुढे निघून गेले. योगायोगाने याच मार्गाने अहिल्याबाईचा रथ गेला आणि त्यांना वासरू मरून पडलेले दिसले. आजूबाजूच्या लोकांना विचारले असता त्यांनी मालोजीरावांचे नाव सांगितले. अहिल्याबाई भयंकर संतापल्या. तडक त्या महालात गेल्या व त्यांनी मालोजीरावांच्या पत्नीला बोलावून घेतले व विचारले की एका आईच्या समोर तिच्या असहाय मुलाची रथाखाली चिरडून हत्या झाली असेल तर काय शिक्षा असावी .त्यावर सुनबाई म्हणाल्या ,त्या खुन्यालाही तशीच प्राणदंडाची शिक्षा हवी .लगेच अहिल्याबाईंनी राज दरबार बोलावला आणि आपला मुलगा मालोजीराव याला त्याचे हात पाय बांधून त्याच रस्त्यावर टाकून त्याच्यावरून रथ भरधाव नेण्याची आज्ञा केली.
 
राजपुत्राला मृत्युदंड देणे ही बाब अवघड तर होतीच पण तिथे असलेल्या कुणालाही मान्य नव्हती. कुणीही तो रथ हाकण्यासाठी तयार नव्हता. तेव्हा खुद्द अहिल्याबाईंनी सारथी होऊन रथाची कमान आपल्या हाती घेतली .आश्चर्य बघा रथ वेगाने येत असताना मार्गात तीच गाय आडवी आली आणि तिने जणू काही रथ थांबवला. तेव्हा मंत्र्यांनी आणि सर्व नागरिकांनी अहिल्याबाईंना विनंती केली की या गाईची सुद्धा मालोजीरावांचा बळी जावा अशी इच्छा नाही तेव्हा तुम्ही त्यांना क्षमा करावी आणि अहिल्याबाईंनी मालोजीरावांना क्षमा केली. अशा होत्या न्यायप्रिय ,कर्म कठोर शासक अहिल्याबाई. पेशव्यांचा सुभेदार म्हणून ३० वर्षे सतत मराठ्यांच्या इतिहासात तेजाने तळपणारा मल्हार रावांचा तारा निखळला तेव्हा ती खरोखर एकाकी झाली .पुढे आठ महिन्यातच पुत्राच्या निधनाचे दुःखही तिला पचवावे लागले.
 
चतुरसत्र आणि मुत्सद्दी मल्हार रावांच्या कारकिर्दीतील दैनंदिन घडामोडी अहल्या बाईसाठी चालते बोलते प्रशासनाचे धडे ठरले होते .सासऱ्याच्या कुशल मार्गदर्शनाने अहल्याबाई सैन्य,महसूल, उत्पादन ,खाजगी व्यवहार इत्यादी सर्व बाबतीत समर्थ तर बनलीच होती पण अफाट प्रदेशाची व संपत्तीची मालकीण होऊन आपल्या न्यॉयप्रशासनाने जनतेची खऱ्या अर्थाने माता बनली होती.
 
अधिकाऱ्यांची अचूक निवड व त्यांना दिली जाणारी माणुसकीची वागणूक हे अहल्याबाईंच्या प्रशासनाचे वैशिष्ट्य होते .सैन्याची कामगिरी तुकोजी होळकरांकडे सोपविली व पुढे तीस वर्षे ही व्यवस्था अबाधित राहिली तर गोविंद पंत गानू यांनी अहल्या बाईंच्या हयात भर त्यांचा खाजगीचा व्यवहार चोखपणे पाहिला यातच तिच्या यशाचे गमक आहे.
 
लुटमार करणाऱ्या भिल्लांचा उपयोग राज्य रक्षणासाठी करण्याची अभिनव व साहसी कल्पना अहल्याबाईने प्रत्यक्षात उतरवली जी भिलकवडी योजना या नावाने प्रसिद्ध आहे. महेश्वरी लुगडी व हातमागाचे कापड लोकप्रिय करण्यात अहल्याबाईचा वाटा मोठा आहे.राजाश्रय मिळाल्यामुळे या उद्योगाची भरभराट झाली. विणकारांना रोजगार तर मिळालाच त्यांची कला जगप्रसिद्ध झाली. अहल्याबाई गुण ग्राहक होती.
 
आर्थिक व्यवहार मग तो वैयक्तिक असो की सार्वजनिक त्या अत्यंत चोख व हिशोबी होत्या. ओंकारेश्वरच्या यात्रेला गेल्या असताना कमाविसदाराकडून घेतलेले ५८ रुपये अहल्या बाईने आपल्या नावावर करायला सांगितले. Ahilyabai Holkar Jayantiअहल्या बाईंच्या आज्ञेनुसार कैद्यांच्या स्त्रिया व मुले यांना रोज एक शेर ज्वारी दिली जात असे. वज्रादपि कठोराणि मृदुनी कुसुमादपी असलेल्या लोकोत्तर अहल्याबाई गुन्हेगारांच्या बाबतीत अत्यंत कठोर असल्या तरी या माणूसकीच्या वागणुकीत त्यांचे असामान्यत्व दडले आहे. कठोरता व कोमलता यांचे अपूर्व मिश्रण त्यांच्या स्वभावात दिसून येते.
 
होळकर संस्थानची सनद प्राप्त झाल्यानंतर म्हणजे इसवीसन १७६७ मध्ये अहिल्याबाईने महेश्वर ला आपली राजधानी केली .तिथे नर्मदेकाठी घाट व देवळे बांधली .भारताच्या कानाकोपऱ्यातून निरनिराळे तज्ञ ,शास्त्री अशा अनेक विद्वान मंडळी ना प्रयत्नपूर्वक महेश्वर येथे स्थायिक करून सांस्कृतिक दृष्ट्या आपली राजधानी समृद्ध केली .इंग्रजांच्या विरुद्ध सर्व मराठी सरदारांनी आपले व्यक्तिगत सोडून वैर सोडून एकत्र यावे यासाठी ती सतत प्रयत्नशील होती. नागरी प्रशासन हे आवडते क्षेत्र असले तरी सैन्याच्या व्यवस्थेकडे तिने कधीच दुर्लक्ष केले नाही.अहल्याबाईना युद्धाचे नगारे व तोफांचे आवाज यापेक्षा देवळातला घंटा नाद अधिक प्रिय होता.
 
अहल्याबाई हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहते ती हातात शिवलिंग घेतलेली शुभ्र वस्त्रा, सात्विक,तेजस्वी मूर्ती. रोज भल्या पहाटे उठून पार्थिव लिंग पूजा व धार्मिक कार्य आटोपूनच राजकारणाला प्रारंभ करीत असत,न्यायनिवाडा करीत असत.व्यक्तिगत सुखोपभोग शून्य असल्याने आपल्या खाजगीतूनच त्या दानधर्म करीत असत .आजही भारताच्या कितीही दुर्गम भागात गेलो तर अहल्याबाईने बांधलेली मंदिरे,घाट ,विहिरी ,तलाव अन्नछत्र ,धर्मशाळा दिसणार नाहीत असे होत नाही. बनारस येथील मनकर्णिका घाट व तारकेश्वराचे अप्रतिम मंदिर .काशी आणि सोमनाथ येथील उद्ध्वस्त मंदिरांचा जीर्णोद्धार ,दळणवळणाची साधन आणि प्रवासांच्या गरजा लक्षात घेऊन केलेल्या सुख सोयी बघून मन आजही थक्क होतं.
धैर्य ,शौर्य ,चातुर्य, वात्सल्य पूर्ण माधूर्य तसेच सेवा परायणता भक्ती आणि विरक्ती या अपूर्व गुणांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य तिच्या व्यक्तिमत्त्वात उमटलेलं दिसतं .गंगाजळ निर्मळ,देवी, मातोश्री ,पुण्यश्लोक ,प्रजावत्सल लोकमाता अशा पवित्र उपाधींनी विराजमान असलेली कर्तुत्व शालिनी अहल्याबाई.आज जयंती निमित्ताने तिच्या चरणी शत शत वंदना!!
 
यामिनी पांडे
31/05/2024
नागपूर
Mobile(9823793100)
Powered By Sangraha 9.0