-नऊ हजार हेक्टरवर झाले होते पीक नुकसान
-आचारसंहिता संपल्यानंतरच भरपाई
अकोला,
unseasonal rains जिल्ह्यात यंदा 9 ते 13 एप्रिल दरम्यान झालेल्या प्रचंड अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला. त्या नुकसानीपोटी 27 कोटी 24 लाख 17 हजार 940 रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव शुक्रवार 3 मे रोजी शासनाला सादर करण्यात आला असून शासनाकडून या निधीस मंजुरी केव्हा मिळते याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यावर कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. त्यात 286 गावांत 12,878 शेतकर्यांचे 9,909 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे, असे पाठविलेल्या अहवालात नमूद केले आहे.
unseasonal rains इतकेच नव्हे तर यंदा फेब्रुवारी महिन्यातही अवकाळी पावसाने 9,152 हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. त्यानंतर 9, 10, 11 व 13 एप्रिल रोजीही गारपीट व अवकाळी पावसाचा, गहू, कांदा, तीळ, ज्वारी व लिंबू पिकांना फटका बसला आहे. याची नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळावी यासाठी तो अहवाल शासनाकडे धाडण्यात आला आहे. 26 फेब्रुवारीच्या रात्री गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान केले होते. याच्या अंतिम सर्व्हेक्षण अहवालानुसार चार तालुक्यातील 9,152 हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाले असून 21 कोटी 10 लाख 31 हजार 482 रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने 22 मार्च रोजी शासनाला सादर केला असून त्या निधीस अजूनही मंजुरी मिळालेली नाही. आता बहुधा आचारसंहिता संपल्यानंतरच शेतकर्यांना ही नुकसान भरपाई मिळेल असे दिसत आहे. हे होत नाही तोच गेल्या महिन्यात 23 एप्रिल रोजी गारपीट व अवकाळी पावसाचा फटका 1,313 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला. कांदा, ज्वारी, लिंबुसह अन्य फळबागा, पानपिंपरीचे नुकसान झाले.तसेच 128 घरांची पडझड झाली असून तीन बैलांसह 700 कोंबड्या दगावल्या आहेत. याचा फटका अकोला, बार्शिटाकळी, अकोट, पातूर तालुक्याला बसला आहे.