-तक्रारी दाखल केल्यावरही चोरट्यांचा शोध नाही
-शेतकर्यांना बसला चोर्यांचा फटका
मूर्तिजापूर,
robbers steal electric motor तालुक्यातील माना पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या कुरुम या परिसरात दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. परिसराची लोकसंख्या सुमारे 8 ते 10 हजार आहे. कुरुम मंडळात 10 ते 12 गावांचा समावेश आहे. अशा स्थितीत येथे एकच पोलिस चौकी आहे. एवढे मोठे गाव असूनही येथील पोलिस कर्मचारी स्थिती हाताळू शकत नाहीत. असे या परिसरात वारंवार घडणार्या चोरींच्या घटनांवरून दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कुरूम परिसरात चोरट्यांचे मनोधैर्य उंचावलेले दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. येथील पोलिस चौकी दररोज बंद असते. ही बाब चोरट्यांसाठी लाभाची ठरत आहे. चोरट्यांना वेसण घालणे पोलिस प्रशासनासाठी आव्हान बनले आहे. त्यासाठी पोलिस चौकीचे पोलिस ठाण्यात रूपांतर करणे गरजेचे झाले आहे अशी नागरिकांची मागणी आहे.
robbers steal electric motor कुरूम परिसरात गेल्या दोन वर्षांपासून चोरट्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. शेतकर्यांच्या घरातून व शेतातून मोटारसायकल, सोयाबीन, तूर भरलेली पोती अशा अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर चोरट्यांनी शेतकर्यांच्या शेतात ठेवलेले साहित्य चोरण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये स्प्रिंकलर नोझल, पाईप, ताडपत्री, केबल अशा वस्तू चोरून रातोरात विकल्या जात होत्या. याबाबत शेतकर्यांनी पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र आजपर्यंत एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. किंबहुना पोलिसांनी चोर्यांचा आणि चोरट्यांचा शोधच घेतलेला नाही असे दिसून येत आहे. आणि आता चोरट्यांची हिंमत एवढी वाढली आहे की त्यांनी विहिरीच्या आतून इलेक्ट्रिक सबमर्सिबल मोटर पंप चोरण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच कुरुम परिसरातील अनेक शेतकर्यांच्या शेतातील विहिरीतून 5 हॉर्सपावर सबमर्सिबल इलेक्ट्रिक मोटर पंप चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यापैकी कुरूम परिसरातील एका शेतकर्याने माना पोलिस ठाण्यात चोरीची फिर्यादही दिली आहे. इतके होवूनही पोलिस अधिकारी गप्प आहेत. ते चोरांचा शोध घेतच नाहीत. याचा परिणाम कुरुम परिसरातील गरीब शेतकर्यांना भोगावा लागत आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालणे आवश्यक आहे अशी नागरिक आणि शेतकरी यांनी मागणी केली आहे.