Eknath Shinde-Vadettivar आम्ही तुम्हाला चांगलं समजत होतो, मित्र समजत होतो. पण, तुम्हीदेखील खोटं बोला पण रेटून बोला, सुरू केलेले दिसते. यांच्या संगतीत राहून ‘वान नाही पण गुण लागला दिसतो तुम्हाला’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना टोला लगावला.
विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही नेहमी शेतकर्यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकर्यांना फसवले म्हणता तर, विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला आकडेवारी बघण्याचा, मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती बघा आणि छातीवर हात ठेवून सांगा, अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपिटीला दोन वर्षांत 15 हजार कोटी रुपये इतिहासात कधी दिले नव्हते. ते आम्ही शेतकर्यांच्या थेट खात्यात जमा केले. एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट देण्याचा निर्णय करून दिले. शिवाय, सततच्या पावसामुळे होणार्या नुकसानीला कधीही भरपाई मिळत नव्हती. Eknath Shinde-Vadettivar ती देण्याचा निर्णय घेतला आणि द्यायला लागलो. एक रुपयात पिक विमा दिला. शेतकर्यांचे हप्ता भरण्याचे टेंशन दूर करून, संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतली. केंद्र सरकार 6 हजार रुपये शेतकर्याला देते. त्यात राज्य सरकारने 6 हजार द्यायला सुरुवात केली. कधी दिली जायची ही मदत. असा प्रश्न करताच, वडेट्टीवारांनी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, खरं ऐकण्याची हिंमत ठेवा. नुसतं खोटं बोला रेटून बोलाची सवय लागलेली दिसते तुम्हाला, असा टोला लगावला.