भावना गवळींना उमेदवारी न देणे पडले महागात

05 Jun 2024 18:56:15
यवतमाळ - वाशीम लोकसभा
वाशीम, 
भावना गवळी यांना यवतमाळ - वाशीम bhavna gavli लोकसभा मतदार संघामधुन उमेदवारी नाकारणे मायुतीला अतीशय महागात पडले. सलग पाच टर्म म्हणजे २५ वर्ष खासदार असणार्‍या भावना गवळी यांची उमेदवारी ज्यावेळी कापल्या गेली त्याच वेळी ही जागा आयती विरोधकांना दान केल्याचे राजकीय विरोधकांचे मत होते.भावना गवळी यांचा २५ वर्षाचा खासदारकीचा कालखंड फार मोठा असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क, त्यांनी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची प्रचंड फौज, नागरिकांशी सतत संपर्क, वेळ काळ न बघता कोणाच्याही मदतीला धावून जाणे अशी त्यांची कार्यपद्धती होती. आपल्या या कर्तुत्वाच्या यशावर त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना धुळ चारली आहे. परंतु, ऐनवेळी भावना गवळी यांना तिकीट नाकारुन महायुतीने घोळ केला अन् घात झाला.
 
 
भावना गवळी
 
या लोकसभेच्या निवडणुकीमुळे वाशीम  bhavna gavli  जिल्ह्यातील महायुतीच्या संघटनात्मक बांधणीचेही पितळ उघड पडले आहे. गेली पंचवीस वर्ष भावना गवळी ह्या फक्त आपली मेहनत व स्वकर्तुत्वावर निवडुन येत गेल्यामुळे महायुतीचा फुगा फुटला नाही, एवढीच समाधानाची बाब. वाशीम जिल्ह्यामध्ये वाशीम आणि कारंजा हे दोन विधानसभा मतदार संघ भाजपा च्या ताब्यात असूनही त्यापैकी एकाही तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना लिड मिळाला नाही. एकमेव पुसद वगळता सर्व ठिकाणी उबाठा चे संजय देशमुख यांनी बाजी मारली. कारंजा मतदार संघाचे आ. राजेंद्र पाटणी आज जरी ह्यात नसले तरी वाशीम विधानसभेचे आ. लखन मलिक यांच्याकडुन राजश्री पाटील यांना अपेक्षा होती.
 
परंतु, नवख्या राजश्री पाटील  bhavna gavli  यांना नेमका अभ्यास नसल्यामुळे वाशीम विधानसभा मतदार संघानेही त्यांचा घात केला. त्यामुळे भाजपाने याबाबीची गंभीर दखल घेत संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यामध्ये गंभीर परिणामांना सामोरे जावे लागु शकते, असे निरीक्षकांचे ठाम मत आहे.कारंजा आणि वाशीम हे दोन विधानसभा भाजपाकडे असूनही वशीम जिल्ह्यामध्ये एकाही स्थानीक स्वराज्य संस्था भाजपाच्या ताब्यात नाही. यावरुन त्यांच्या कार्यक्षमतेची व संघटनात्मक बांधणीसाठी लागणार्‍या योगदानाची सहज कल्पना यावी. निव्वळ पदाधिकार्‍यांच्या नेमणुकीने पक्ष तळागाळापर्यंत पोहचू शकत नाही, हे श्रेष्ठींनी समजुन घ्यायला हवे, हाच या निकालाचा निष्कर्ष असु शकतो. महायुतीचा उमेदवार निवडुन आणण्यासाठी बुथ प्रमुख व त्यांचे कार्यकर्ते झटले. नेते आले आणि गेले. परंतु, त्या कार्यकर्त्यांना चहा पिण्यासाठी सुद्धा कोणी विचारले नाही. नेते व तालुका, जिल्हा स्तरावरील पदाधिकार्‍यांनी केवळ पुढे पुढे करुन आम्ही किती जिद्दीने पक्षाचे काम करत आहो, असा दाखविण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या नेत्याकडे ग्रामीण भागाचे नियोजन होते, त्यांनी उटावरुन शेळ्या हाकण्याचे काम केले.
Powered By Sangraha 9.0