- बबनराव तायवाडे यांची मागणी
- ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन ७ ऑगस्ट रोजी
नागपूर,
राज्याच्या सर्व विभागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसीला योग्य आणि पुरेसे प्रतिनिधित्व देण्यासाठी केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करावी. स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत सुरु करण्याकरिता लोकसंखेच्या प्रमाणात २७ टक्के राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे. स्वतंत्र केंद्रीय मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष Babanrao Taiwade डॉ. बबनराव तायवाडे यांनी पत्रपरिषदेत केली.
ते पुढे म्हणाले, कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलीयरची घटनाबाह्य अट रद्द करण्यात यावी तसेच नॉन क्रीमिलीयरची मर्यादा २० लाख करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी ओबीसी ९ वे राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसर येथील गोल्डन जुबली कन्वेनशन सेंटर (गुरुनानक भवन) येथे ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
Babanrao Taiwade : महाअधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वा. होणार असून याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,आयुष मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहे. तर समारोप प्रसंगी दुपारी ३ वाजता आयोजित कार्यक्रमात बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाजुला श्रीनिवास गौड, आ.जीवनज्योत कौर, राज बब्बर आदींची उपस्थिती आहे.