बदलापूर/मुंबई,
Badlapur-Encounter बदलापूरमध्ये बालिकेच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर आता त्याच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यावरून वाद सुरू झाला आहे. त्याच्या अंत्यविधीसाठी प्रशासनाकडून योग्य जागाच उपलब्ध केली जात नसल्याने अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांना उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून स्मशानभूमीत जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा सुरू आहे. जागा उपलब्ध होताच आज किंवा उद्या सकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Badlapur-Encounter या अंत्यसंस्कारासाठी ठाणे पोलिसांनी बदलापूर, अंबरनाथ आणि ठाण्यातील स्मशानभूमींची चाचपणी सुरू केली आहे. शिवाय, त्याच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन, या अंत्यविधीला केवळ जवळच्या नातेवाईकांनीच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्य सरकारने हाताळावा, असं न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, दफनभूमी ही शासनाची असून कोणाच्याही मालकीची नाही. त्यामुळे मृतदेह दफन करण्यासाठी अंबरनाथ येथे जागा देण्यास का नकार दिला, याबाबतीत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांच्या वकीलांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Badlapur-Encounter सरकारी जमीन ही कुठल्याही जातीधर्माची नसून त्या जागेवर अंत्यविधी नाकारणारे लिंगायत समाज आणि गोसावी समाज यांचा दफनभूमीवर मालकी हक्कआहे का? असा सवाल शिंदे यांच्या वकिलांनी उपस्थित केला. अक्षयच्या मृतदेहाची अवहेलना होत आहे. मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी कायदा आहे. त्या कायद्यानुसार उच्च न्यायालयामध्ये मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही धाव घेणार आहोत, अशी भूमिका वकीलांनी प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे.