संत साहित्यातील अनुभव सिद्धांत

08 Sep 2024 05:50:00
संत प्रबोधन
Saint Awakening : संतांनी आपले अनुभव ‘सिद्धांत संत साहित्या’मध्ये केले आहेत. ते त्यांचे अनुभवाचे बोल आहेत. आपल्या जीवन कालमर्यादेमध्ये त्यांनी समाज निरीक्षणातून घेतलेले अनुभवाचे हे सिद्धांत महत्त्वाचा ठेवा आहे. त्यातून त्यांनी उलगडा केला आहे. जग कितीही वाईट वागले तरी आपण आपले चांगूलपण सोडू नये, हा महत्त्वाचा सिद्धांत त्यातून प्रकर्षाने जाणवतो.
 
 
sant-tukaram
 
‘अनुभवे आले अंगा | ते या जगा देतसे’
तुकारामांना जीवन जगत असताना जे काही बरे-वाईट अनुभव आले, ते त्यांनी प्रस्तुत अभंगातून विशद केले आहेत. अनुभवातून व्यक्ती हुशार होतो. अगदी त्याचप्रमाणे जगाला सन्मार्गाकडे जाण्याचा उपदेश संत तुकारामांनी केला आहे. संत तुकारामांना ज्या सिद्धांताचा अनुभव आला तोच त्यांनी या जगाच्या हाती दिला. म्हणून त्यांचा हा उपदेश केवळ शाब्दिक नाही एखादी वस्तू तळहातावर घेऊन तिचे वजन सांगावे त्यापैकी नाही.
तुकारामांनी प्रथमतः त्याचे स्वतः आचरण केले, अनुभवले. त्यानंतरच ते जगासमोर मांडले. त्यांच्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे अनुभव आणि त्या शब्दांच्या मुळात लोककल्याणाविषयी अंतरीचा ओलावा आहे. जे शब्द अनुभवाच्या कसोटीवर उतरले आहेत आणि ज्यात शांत रस असल्याची खात्री आहे, तेच तुमच्या हाती आहे. संत तुकाराम म्हणतात, माझ्या बोलण्यात सिद्धांतावाचून दुसरे काहीही नाही.
अनुभवे आले अंगा | ते या जगा देतसे ॥१॥
नव्हती हाततुके बोल | मूळ ओल अंतरिची ॥२॥
उतरुनि दिले कशी | शुद्धरसी सरे ते ॥३॥
तुका म्हणे दुसरे नाही | ऐसी ग्वाही गुजरली ॥४॥
(तु. गा. २८३५)
‘बोले तैसा | त्याची वंदावी पाऊल’ या उक्तीनुसार जसे बोलायचे, तसे कर्म करायचे. आपले वर्तन ठेवायचे. लोकांना जसे वागायला सांगण्याचा उपदेश करायचा तसे सांगण्यापूर्वी स्वतः वागून दाखवायचे. ज्या गोष्टी इतरांनी करू नयेत, त्या गोष्टी आपण स्वतःही करायच्या नाहीत. हे संत तुकारामांच्या व्यक्तित्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य त्यांनी स्वतःच्या आचरणातून लोकांसमोर ठेवले.
बोलल्यासारखे वागणे त्यांच्या दृष्टीने संतत्वाची कसोटी होती. ही कसोटी स्वतःच्या जीवनाला लावणे कठीण असते; पण महत्त्वाचेही असते. समाजाचे हित साधण्यासाठी आपल्यावर काही जबाबदार्‍या येतात. कोणत्याही क्षेत्रात समाजाचे नेतृत्व करणार्‍या व्यक्तींवर काही नैतिक बंधने येतात. स्वतःच्या आचरणाने लोकांना धडा घालून देणे, त्यांना वाट दाखवणे, हे त्यांचे कर्तव्य ठरते. विवेकाच्या व अनुभवाच्या बळावर तुकारामांनी किती मोठी उंची गाठली होती, हे त्यांच्या प्रस्तुत अभंगावरून दिसून येते.
 
 
संतांचा अनुसरण मार्ग
अर्भकाचे साटी | पंते हाती धरिली पाटी ॥१॥
तैसे संत जगी | क्रीया करूनी दाविती अंगी ॥ध्रु॥
बालकाचे चाली | माता जाणुनि पाऊल घाली ॥३॥
तुका म्हणे नाव | जनासाठी उदकी ठाव ॥४॥
(तु. ४०६२)
Saint Awakening : आचारधर्माच्या या मूल्यांसाठी संत तुकारामांनी आईच्या वागण्याचे दिलेले उदाहरण मोठे मार्मिक आहे. जसे एखाद्या मुलाच्या आईला स्वतःला चालता येत असूनही ती जाणीवपूर्वक मुलाच्या पावलाबरोबर छोटी छोटी पावले टाकत असते. ‘तुझा तू चालायला शिक’असे म्हणून तो चालायला शिकणार नाही. ‘तुझा तू लिहायला शिक’ असे म्हणून तो लिहायला शिकणार नाही. हे सगळे स्वतः करायचे, असे ते सांगतात. समाजातील भोळीभाबळी माणसेही या लहान माणसासारखी असतात. म्हणून त्यांनी तसे वागावे, अशी संतांची इच्छा असते; तसे ते स्वतः वागतात आणि लोकांपुढे आदर्श ठेवतात. सदाचार निर्माण होण्यासाठी संत तुकारामांनी आपल्या आचरणाने आपल्या लोकांना आदर्शाचा धडा घालून दिला. स्वतःच्या वाट्याला आलेली कर्जखाती त्यांनी इंद्रायणीत त्या कृतीतून त्यांनी भोळ्याभाबड्या समाजाला कर्जातून मुक्त केले व नंतरच सांगितले. संत तुकारामांनी गृहस्थाश्रमाला महत्त्वाचे स्थान दिले आहे.
 
 
 
संत एकनाथांचा अनुभव
आचाराविषयी संत एकनाथ महाराज म्हणतात-
जया करणे आत्महित |
स्वधर्म आचरावा सतत ॥१॥
कर्मे नित्य नैमित्तिक | ब्रह्मप्राप्ती लागी देख ॥२॥
तिची नित्य आचरावी | चित्तशुद्धी तेणे व्हावी
एका जनार्दनी कर्म | ईश भक्तीचे हे वर्म ॥४॥
(ए. भा. २१६०)
Saint Awakening : गृहस्थाश्रम म्हणजेच संसार कसा आदर्शमय पद्धतीने करावा, असे ते सांगतात. प्रपंचासाठी अनेक लोक धन जोडतात. परंतु त्यासाठी ते अनीतीचा, वाममार्गाचा अवलंब करतात. त्या मार्गाने जोडलेली संपत्ती ती आसुरी संपत्ती होय. धनासाठी धर्म-नीतीचा वापर करून उत्तम शेती, व्यापार त्याचा व्यय स्वार्थ निरपेक्ष बुद्धीने करा. दुसर्‍याची निंदा करण्याने आपले अहितच होईल. परोपकार करा, परस्त्रीला माता भगिनीसारखे माना. अंतःकरणामध्ये प्राणिमात्रांविषयी दया असू द्या. गाय व पशूंचे पालन करा. सदाचार हेच गृहस्थाश्रमाचे भूषण आहे. सदाचाराने वैराग्यामध्ये वाढ होऊन वैराग्याने भक्ती व भक्तीने आपण परमेश्वराच्या अगदी निकट पोहोचतो. त्यामुळेच त्याला परमपदाची होते.
 

sant-eknath 
 
संत ज्ञानेश्वर यांचा अनुभव भक्ती मार्ग
संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे उत्तम प्रकारची कर्मे जर आपण सर्वात्मक ईश्वराला अर्पण केली तर ती त्या सर्वात्मक ईश्वराची सर्वोत्कृष्ट भक्ती होईल.
तरी उचिते कर्मे आघवी | तुवां आचरोनि मज अर्पावी |
तरी चित्तवृत्ति न्यासावी | आत्मरुपी ॥
(ज्ञाने. ३/१८६)
हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य वोलावा ॥
आणि हेचि परम सेवा | मज सर्वात्मकाची ॥
(ज्ञाने. १८/९०६)
तया सर्वात्मका ईश्वरा | स्वकर्मकुसुमांची वीरा ॥
पूजा केली होय अपारा | तोषालागी ॥
(ज्ञाने. १८/९१७)
कर्जखाते बुडवण्यामागचा संत तुकारामांचा विवेक, त्यांचे कृतीचे संतुलन समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांनी दुबळेपणातून हे कृत्य केले नसून समाजामध्ये मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी केले आहे. सामाजिक मूल्यांच्या संवर्धनार्थ केले आहे.
 
 
सामाजिक व्यवहारातील जातिनिरपेक्षता
Saint Awakening : समाजातील या गोष्टीकडे लक्ष वेधताना संत तुकारामांनी आपल्या व्यवहाराशीच लक्ष केंद्रित करावे, अशी शिकवण देऊन जातिनिरपेक्ष सिद्धांताची मांडणी केली आहे. तो सिद्धांत म्हणजे वाण्याच्या दुकानातून गूळ विकत घेताना पैसे मोजा आणि गूळ खरेदी करा. त्यासाठी त्याची जात आहे, हे पाहण्याची गरज नाही. समाजामध्ये वागताना अशा प्रकारचे व्यवहार जातिनिरपेक्ष पद्धतीने करा, असा संदेश ते देतात. त्यांनी सांगितलेले तुळशीचे उदाहरणही मोठे लक्षवेधक आहे.
तुळस उकिरड्यावर उगवली तर ती टाकून द्यायची काय? तर नाही, ती स्वीकार्य असते. तुळशीचे माहात्म्य तिच्या उगवण्यावर अवलंबून नसते तर तिच्या अंगी असलेल्या औषधी गुणधर्मावर तसेच फणसाचे आहे. त्याच्या सालीकडे पाहून, ओबडधोबड आकाराकडे पाहून त्याला टाकून दिले तर त्याच्यामधील मधाळ गाभा व चविष्ट बियांपासून आपण वंचित राहू. त्याचप्रमाणे वर्ण, जात, पंथ या गोष्टी फणसाच्या वरच्या सालीसारख्या आहेत. तर आचार, विचार, गुण त्याच्या बियासारख्या आहेत. म्हणून गुणवान व्यक्ती हलक्या जातीत जन्मला तर त्याला दूर सारायचे तर त्याला जवळ करायचे असते. जातीसारख्या बाह्य गोष्टींकडे पाहिले तर गुणी व्यक्तीच्या संगतीला आपण मुकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याबरोबर केल्या जाणार्‍या व्यवहारांचा आनंदही गमावून बसू. संत चोखोबांनीही जातिनिरपेक्षतेचा एक महत्त्वपूर्ण दाखला आपल्या अभंग वाङ्मयात दिला आहे. तो असा-
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा ॥१॥
डोंगी परी तिर नोहे डोंगा
काय भुललासी वरलिया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जल नोहे डोंगा |
काय भुललासी वरलिया रंगा ॥३॥
चोखा डोंगा परी जल नोहे डोंगा |
काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥
(सकल संतगाथा, चोखामेळा, -१२५)
समाजामध्ये व्यवहारातील सचोटी सांगताना कसे वागावे, वरवरच्या गोष्टीवर भुलून न जाता गाभा-गुणधर्म तपासून पाहावा. अन्यथा आपली फसगत होईल किंवा चांगल्या वस्तूच्या, चांगल्या गोष्टीच्या प्राप्तीपासून दूर राहू, असे व्यवहारज्ञान संत तुकारामांसहित सर्व संत सांगतात.
संत कबिरांनीही समाजामध्ये व्यक्तींची पारख करताना कोणती कसोटी वापरावी, ते सांगितले आहे.
जाती न पुछो साधु की | पुछो उसका ग्यान ॥१॥
मोल करो तलवार का | रहने दो म्यान ॥२॥
(सकलसंतगाथा- कबिराचे दोहे)
महाराष्ट्रातील संतांनी त्यांच्या त्यांच्या जीवन कालखंडामध्ये जे वास्तव अनुभव त्यांना आले. त्याचे योग्य व वास्तव चिंतन अनुभवाचे कथन सिद्धांताद्वारे मांडून जगासमोर एक आदर्श आचारसंहिता प्रस्थापित केली. त्याचे अनुसरण जर वर्तमान काळामध्ये केले गेले तर, त्यातून एक सात्त्विक, सर्जनशील व योग्य आचरण करणारी निर्माण होईल.
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
७५८८५६६४००
 
Powered By Sangraha 9.0