कारंजा लाड,
farmers in trouble : मागील काही दिवसापासून कारंजा तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, रविवारी काही भागात पावसाच्या हलक्या सरी देखील बरसल्या. त्यामुळे संपूर्ण तालुक्यावर धुयाची चादर पसरली. ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे रब्बी पिके धोक्यात सापडल्याने शेतकर्यांची चिंता वाढली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात कारंजा तालुक्यात जवळपास १० हजार हेटरवर गहू व हरभरा या प्रमुख पिकांसह इतर रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली. त्यानंतर शेतकर्यांनी मेहनत व मशागत करून पिके वाढविली आणि ऐन हरभरा घाट्यावर असताना आणि गहू ओंब्यावर असताना ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभर्यावर मररोग आणि घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची तर गव्हावर तांबेरा रोग येण्याची शक्याता निर्माण झाल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहे. शेतकर्यांच्या उत्पादनवाढीच्या नियोजनावर निसर्गाचा लहरीपणा कायम पाणी फेरत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचा सत्यानाश झाला होता. आता तीच स्थिती रब्बी हंगामातही दिसत आहे.
आधीच बाजारात शेतमालास अपेक्षित दर मिळत नाहीत. त्यात वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. मागील १५ दिवसांपूर्वी देखील अचानक ढगाळ वातावरणासह अवकाळीच्या सरी आल्या. त्यानंतर मात्र वातावरण कोरडे राहिले आणि पुन्हा ११ जानेवारीपासून ढगाळ वातावरण तयार झाले. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्याता वाढली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभर्यासह इतर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.