नागपूर,
Ganesh Naik : उमरेड-पवनी-कर्हांडला अभयारण्य असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पर्यटकांनी वनविभागाच्या नियमावलीचे पालन करावे, अन्यथा कारवाई केल्या जाईल, इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाढत्या वन्यप्राण्यांच्या व्यवस्थापनावर राष्ट्रीय पातळीवर दोन दिवसीय परिषद झाली. या परिषदेनंतर ते बोलत होते. उमरेड-पवनी-कर्हांडला अभयारण्यात ३१ डिसेंबरला पर्यटकांच्या वाहनांनी एफ-२ वाघीण आणि तिच्या बछड्याची बराच वेळपर्यंत वाट अडवली होती. त्यानंतर समाजमाध्यमावर ही चित्रफित प्रसारित होताच सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटले. पर्यटक वाहनचालक आणि मार्गदर्शक यांच्यावर कारवाईत झाली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वृत्ताची दखल घेत स्वत:हून याचिका दाखल करुन घेतली. राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
व्याघ्रदर्शन घडवलेच पाहीजे
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, पर्यटकांना व्याघ्रदर्शन पाहीजे, पण त्यासाठी नियमावली आहे. त्या नियमावलीचे पालन व्हायलाच पाहीजे. अशाप्रकारच्या घटनांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. वाघांना शिकार मिळाली नाही तर ते मुख्य मार्ग ओलांडून बाहेर येतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे, त्याचा अभ्यास करून राज्यात देखील त्या लागू करण्यात येतील, असे म्हणाले.
पैसे भरुन व्याघ्रप्रकल्पात कॅमेरे नेता येतात, मग भ्रमणध्वनीवरच बंदी का, असा थेट प्रश्न वनमंत्री गणेश नाईक यांनी वनाधिकार्यांना विचारला. त्यावर अधिकार्यांनी दिलेल्या उत्तराने वनमंत्री समाधानी झाले नाहीत आणि त्यांनी अधिकार्यांना काही सूचना दिल्या.
तपासणी अहवालाची प्रतिक्षा
नागपुरात वाघांचे झालेले मृत्यू ही देशातली पहिली घटना असून यासंदर्भात प्रयोगशाळेमध्ये नमुन्यांची करून याचे नेमके कारण शोधल्या जात आहे. या प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचार्यांना देखील कुठलाही त्रास झालेला नाही, त्यामुळे तपासणी अहवाल आल्यानंतरच अधिक भाष्य करता येईल, असेही वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.c