नागपूर,
Chandrashekhar Bawankule : भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतुन विकासाचे राजकारण केले आहे. याउलट काँग्रेसने जाती- जातीमध्ये भांडणे लावून विनाशाचे राजकारण केले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या फरकाने विजयी करत काँग्रेसची जमानत जप्त करा, आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कापसी खुर्द जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत हुडकेश्वर येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.
पंतप्रधान घरकुल योजनेतून घरे मिळणार
आगामी निवडणूकीत भाजपच्या उमेदवाराला निवडून आणा तरच केंद्र आणि राज्य सरकारने दिलेला निधी योग्य उपयोग विकास कामांसाठी करता येईल. अन्यथा विकास कामांपासून वंचित राहण्याची वेळ येवू देवू नका, असे आवाहन बावणकुळे यांनी केले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले तर विकासाचा बट्ट्याबोळ करतील. आपले सरकार हे लोक कल्याणकारी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या जीवनाश्यक वस्तूंवरील कर कमी केला. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे जीवन सुकर होणार आहे. आपण भाजपला दिलेले किती महत्त्वाचे आहे याचा प्रत्यय आपल्याला आला असेल. जे वचन आम्ही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिले होते ते पूर्ण करणार आहोत. ज्यांना घर नाही त्यांना पंतप्रधान घरकुल योजनेतून घरे दिली जाणार आहे.
जनतेसाठी झटणार्या जनसेवकाला तिकीट
लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, शेतकर्यांकडून मोटार पंपाचे वीजबिल घेणार नाही, सर्वसामान्य वीज दरवाढ करणार नाही आणि शेतकर्यांची कर्जमाफी करण्याचा शब्द आम्ही पाळणार आहेत. महसूल विभागाचा मंत्री म्हणून मी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल. आगामी निवडणुका सर्व कार्यकर्त्यांच्या आहेत. मात्र, नेत्यांच्या मागेपुढे फिरणार्या कार्यकर्त्याला तिकीट मिळणार नाही. तर जनतेसाठी झटणार्या जनसेवकाला तिकीट दिले जाईल, असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करा. यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी माजी आ. टेकचंद सावरकर, माजी आ. सुधाकर कोहळे, भाजप अध्यक्ष आनंदराव राऊत, जिल्हा महामंत्री अनिल निधान आदी उपस्थित होते.