नवी दिल्ली,
EPFO will give pension increase या दिवाळीत देशातील खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची १० आणि ११ ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीत कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. २०१४ पासून ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना दरमहा ₹१,००० ची किमान पेन्शन दिली जाते. मात्र, वाढती महागाई आणि बदलता जीवनमान लक्षात घेता ही रक्कम अत्यल्प असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे अनेक कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून पेन्शन वाढवण्याची सातत्याने मागणी होत आहे.
मीडिया अहवालांनुसार, ईपीएफओ लवकरच किमान पेन्शन ₹१,००० वरून ₹२,५०० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. ही वाढ निश्चित झाल्यास, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. तथापि, केंद्रीय पर्यवेक्षक मंडळाने (CBT) काही संघटनांनी मागितल्याप्रमाणे पेन्शन ₹७,५०० पर्यंत वाढवण्यास नकार दिला आहे. तरीही ₹२,५०० पर्यंतची संभाव्य वाढ हा कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीचा दिलासा ठरेल.या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यास, दिवाळीपूर्वी देशातील लाखो खाजगी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.