नवी दिल्ली,
Google historic investment जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल भारतात तब्बल १० अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ८८,७०५ कोटी रुपये) इतकी ऐतिहासिक गुंतवणूक करणार आहे. या अंतर्गत कंपनी आंध्र प्रदेशात देशातील सर्वात मोठे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा सेंटर उभारणार असून, भारताच्या डिजिटल प्रगतीच्या दिशेने हे एक भव्य पाऊल मानले जात आहे. एका वृत्तानुसार, गुगलची मातृसंस्था अल्फाबेट इंक. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे हे अत्याधुनिक डेटा सेंटर कॅम्पस स्थापन करणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि गुगल यांच्यात मंगळवारी औपचारिक करार होणार आहे. प्रकल्पाची क्षमता १ गिगावॅट इतकी असल्याचे राज्यातील मंत्र्यांनी सांगितले.

हे एआय डेटा सेंटर अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सज्ज असेल. येथे उच्च-गतीचे फायबर ऑप्टिक नेटवर्क, मोठ्या प्रमाणावर ऊर्जा स्रोत आणि हजारो सुपरकॉम्प्युटर असलेली संगणकीय प्रणाली बसवली जाणार आहे. याच ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्सना प्रशिक्षण दिले जाईल, त्यांचे संचालन आणि साठवणूक केली जाईल. या गुंतवणुकीमुळे भारतातील डेटा सुरक्षा, डिजिटल रोजगारनिर्मिती, आणि एआय संशोधन क्षेत्रात मोठ्या संधी खुल्या होणार आहेत. तसेच, देशाच्या तंत्रज्ञान पायाभूत संरचनेला नवीन बळ मिळणार आहे.
जगभरातील मोठ्या टेक कंपन्या एआय क्षेत्रात आघाडी मिळवण्यासाठी झगडत असताना, गुगलने आपल्या डेटा इन्फ्रास्ट्रक्चरला आणखी मजबुती देण्याच्या दिशेने हे निर्णायक पाऊल टाकले आहे. गुगलचे हे एआय डेटा सेंटर भारताला जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता नकाशावर ठळक स्थान मिळवून देणार असून, डिजिटल भारताच्या दृष्टीने ही गुंतवणूक ऐतिहासिक ठरणार आहे.