गडचिरोली,
Naxalites surrender before Fadnavis महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या हिंसाचारावर मोठा यशस्वी टप्पा गाठला गेला आहे. नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटी आणि पॉलिट ब्युरो सदस्य तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी आज आपल्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या आत्मसमर्पण कार्यक्रमात नक्षलवाद्यांनी आपले शस्त्र पोलिसांना सुपूर्द केले.

या शरणागतीमुळे राज्यात सशस्त्र नक्षलवाद लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता वाढली आहे. त्याबदल्यात सरकारकडून त्यांना संविधानाची प्रत सुपूर्द करण्यात आली, जे एक प्रतीकात्मक आणि कायदेशीर पावलं ठरली. भूपतीने शरणागती पत्करण्याआधी स्पष्ट केले होते की तो ही प्रक्रिया फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडावी, आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अटीला मान्यता देत आज स्वतः उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला. गेल्या काही दिवसांपासून भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांसह मध्यस्थांच्या माध्यमातून शरणागतीसंबंधी चर्चा सुरू होत्या. भूपतीने स्पष्ट केले की सशस्त्र नक्षलवाद्यांचा मार्ग सोडून सरकारसोबत शांततेच्या मार्गाने मुख्य प्रवाहात येण्याची त्यांची भूमिका आहे.
1980 पासून गडचिरोलीत सुरू झालेल्या नक्षलवाद्यांच्या सशस्त्र चळवळीमध्ये आतापर्यंत ५३८ सामान्य नागरिकांचा जीव गेला आहे. भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शस्त्र खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात नक्षलवाद्यांच्या हद्दपारीकडे मोठा मार्ग खुला झाला आहे. या आत्मसमर्पणामुळे महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या हिंसाचारावर नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तसेच नक्षलमुक्त महाराष्ट्राच्या दिशेनं एक ठोस टप्पा गाठला गेला आहे.