wardha-news यावर्षी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात वेळोवेळी पूरपरिस्थिती ओढावली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध मार्गांची चाळण झाली. याच रस्त्यांच्या दुरुस्तीला शासन स्तरावरून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून जिल्ह्यातील तब्बल ३८५ किमीचे रस्ते गुळगुळीत करण्याचे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे.
जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली. यादरम्यान पूरपरिस्थिती ओढावून जिल्ह्यातील २० पूल क्षतिग्रस्त झाले. शिवाय सुमारे ३०० किमीहून अधिक रस्त्यांची चाळणी झाली. सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाने क्षतिग्रस्त रस्ते व पुलाची तात्पूर्ती दुरुस्ती करून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले. पण, ३८५ किमीच्या क्षतिग्रस्त रस्त्यांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी मंजुरी आणि निधीची गरज असल्याने तसा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला सादर करण्यात आला. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया करून जिल्ह्यातील ३८५ किमीचे क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. विविध विकास कामांच्या देयकापोटी प्राप्त १७ कोटींचा निधी कामे पूर्णत्वास नेणार्या कंत्राटदारांना वितरित करण्यात आला आहे. निधी वितरणाची प्रक्रिया दिवाळीपूर्वीच करण्यात आली आहे. wardha-news जिल्ह्यातील ३८५ किमीचे क्षतिग्रस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून हेही काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सा. बा. विभागाचा मानस आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांनी दिली.