नवी दिल्ली,
Yamuna River in Delhi दिवाळीच्या उंबरठ्यावर दिल्ली आणि परिसर पुन्हा एकदा विषारी हवेत गुदमरू लागले आहेत. सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी सलग सातव्या दिवशी दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४०० च्या पुढे नोंदवला गेला असून, तो गंभीर) श्रेणीत गेला आहे. म्हणजेच दिल्लीची हवा आता श्वास घेण्यासही धोकादायक बनली आहे. आकाशावर धुक्याची चादर पसरली असून, शहरात श्वास घेणे कठीण झाले आहे. त्यातच यमुना नदीत पुन्हा एकदा विषारी फेसाचा थर तयार झाला आहे.
कालिंदी कुंज परिसरात रविवारी आणि सोमवारी नदीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या फेसाचे जाड थर तरंगताना दिसले, ज्यामुळे प्रदूषणाचे संकट आणखी वाढले आहे. या फेसामुळे नदीचे सौंदर्य नष्ट झाले असून तो गंभीर पर्यावरणीय धोक्याचे लक्षण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा फेस उद्योगांमधून निघणारा सांडपाणी व रासायनिक कचरा थेट नदीत सोडल्यामुळे तयार होतो. या पाण्यात डिटर्जंट्स, फॉस्फेट्स, अमोनिया आणि इतर हानिकारक रसायने मिसळलेली असतात, ज्यामुळे फेस तयार होतो आणि विषारी वायू बाहेर पडतात.
दरम्यान, प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कठोर पावले उचलली आहेत. न्यायालयाने आदेश दिला आहे की दिल्ली-एनसीआरमध्ये फक्त राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था यांनी मान्यता दिलेलेच ‘हिरवे फटाके’ विकले आणि फोडले जाऊ शकतात. या फटाक्यांमुळे पारंपरिक फटाक्यांपेक्षा सुमारे ३० टक्के कमी प्रदूषण होते आणि त्यात सल्फर तसेच जड धातूंचा वापर केलेला नसतो.