वर्धा,
Ashutosh Murkute : एमगिरीने ग्रामीण औद्योगिक तंत्रज्ञान विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि उद्यमिता वृद्धीच्या क्षेत्रात देशभरात उल्लेखनीय कार्य केले आहे, अशी माहिती एमगिरीचे संचालक डॉ. आशुतोष मुरकुटे यांनी दिली. यावेळी त्यांनी पूर्वोत्तर राज्ये आणि लेह-लडाख येथे नैसर्गिक संसाधनांच्या मूल्यवर्धनासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी एमगिरीने केलेल्या प्रयत्नांची माहितीही दिली.
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था (एमगिरी) वर्धा येथील जैव-प्रक्रिया व औषधी वनस्पती विभाग आणि माही नॅशनल को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ एफपीओज, नवी दिल्ली यांच्या संयुत वतीने एमगिरी द्वारा विकसित तंत्रज्ञानावर आधारित उद्यमिता विकासाच्या संधी या विषयावर एफपीओंसाठी राष्ट्रीय जागरूकता कार्यशाळेचे आयोजन २७ रोजी करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी, भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष साई रेड्डी, अ. भा. रोजगार प्रमुख कुमारस्वामी, माही-नॅशनल को-ऑपरेटिव्ह फेडरेशनचे संचालक ऋषी कुमार उपस्थित होते.
या कार्यशाळेचा उद्देश ग्रामीण भागातील नवोपक्रम आणि शेतकरी उत्पादक संघटनांमध्ये संवाद प्रस्थापित करून, एमगिरीत विकसित नव्या तंत्रज्ञानांची माहिती देणे आणि त्याद्वारे शेतकर्यांच्या उत्पन्न वाढीबरोबर ग्रामीण उद्यमशीलतेला चालना देणे हा होता.
यावेळी दिनेश कुलकर्णी म्हणाले, एमगिरीचे शास्त्रज्ञ हे केवळ तंत्रज्ञ नसून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात. आपल्या नवोपक्रमांच्या माध्यमातून तंत्रज्ञान थेट गावापर्यंत पोहोचवून शेतकरी व महिला वर्गाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. शेतकर्यांना फत उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता व्यापार आणि मूल्यवर्धनाच्या दिशेने मार्गदर्शन करत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी साई रेड्डी, कुमारस्वामी ऋषी कुमार यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत सहा राज्यांतील एफपीओ फेडरेशन संचालकांनी सहभाग नोंदवला होता. कार्यशाळेदरम्यान एमगिरीच्या वैज्ञानिकांनी संस्थेत विकसित विविध तंत्रज्ञानांवर प्रभावी सादरीकरणे केली. सादरीकरणांनंतर आयोजित ब्रेनस्टॉर्मिंग सत्रात विविध राज्यांतील फेडरेशन संचालकांनी आपल्या प्रदेशात एमगिरीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करता येईल यावर चर्चा केली.
संचालन डॉ. जयकिशोर छांगाणी यांनी केले. तर ऋषी कुमार यांनी आभार मानले.