नागपूर,
High Court ultimatum to Bachchu Kadu माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेले आंदोलन आता न्यायालयाच्या रडारवर आले आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने या आंदोलनाची सुमोटो दखल घेत आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. या आंदोलनामुळे नागपूर शहरात आणि आसपासच्या भागात वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण झाली आहे.
दरम्यान, आंदोलनातून तोडगा निघावा म्हणून राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. न्यायालयाकडून दिलेल्या अल्टिमेटमनंतर सरकार आणि बच्चू कडू यांच्यातील बैठक लवकरच सुरू होणार आहे. चर्चेअंती काही तोडगा न निघाल्यास, बच्चू कडू आंदोलनाचा पुढील मार्ग कोणता अवलंबतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन कालपासून अधिक तीव्र झाले आहे. आंदोलकांनी रेल रोको आंदोलन केल्यानंतर सरकारने तातडीने चर्चेची तयारी दर्शवली आहे. मंत्री जयस्वाल हे सरकारच्यावतीने चर्चेसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले असून, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन करत रेल रोको करू नका”असे स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये सध्या आंदोलनस्थळी तणावपूर्ण पण नियंत्रणात अशी परिस्थिती आहे, तर प्रशासन हायकोर्टाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झाले आहे.