नवी दिल्ली,
Sheikh Hasina appears before media बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अखेर अनेक महिन्यांनंतर आपले मौन तोडत पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशात उसळलेल्या हिंसक आंदोलनांनंतर हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर त्या नवी दिल्लीत राहत असून, नुकत्याच त्या दिल्लीच्या लोधी गार्डन्समध्ये दोन सुरक्षारक्षकांसह फिरताना दिसल्या होत्या.
७८ वर्षीय हसीना म्हणाल्या की, त्या दिल्लीत मुक्तपणे राहत असल्या तरी आपल्या कुटुंबाच्या भूतकाळामुळे आजही सावध आहेत. १९७५ मध्ये झालेल्या लष्करी उठावात त्यांच्या वडिलांसह तीन भावांची हत्या झाली होती, तर त्या आणि त्यांची बहीण त्या वेळी परदेशात होत्या. हो, मला माझ्या देशात परतायच आहे, पण जेव्हा तिथे कायदेशीर सरकार आणि संविधानाच राज्य असेल तेव्हाच, असं सांगून हसीनांनी आपल्या परतीसाठी स्पष्ट अट घातली.
हसीनांनी सांगितले की, अवामी लीग पक्ष सत्तेत असो वा विरोधी बाकावर, तो बांगलादेशाच्या राजकारणात कायम राहील. देशाच भविष्य एखाद्या व्यक्तीवर किंवा कुटुंबावर अवलंबून नसत. बांगलादेशात स्थैर्य आणि संविधानिक शासन असेल तेव्हाच खरी प्रगती शक्य आहे, अस त्या म्हणाल्या. त्यांनी सरकारला इशारा दिला की जर २०२६ च्या निवडणुकांमध्ये अवामी लीगला भाग घेण्याची परवानगी दिली गेली नाही, तर त्यांच्या लाखो समर्थकांकडून निवडणुकीचा बहिष्कार केला जाईल. लोकशाहीत सर्वांना मतदानाचा अधिकार असायला हवा. लाखो लोकांना मतदानापासून रोखणं म्हणजे लोकशाहीच खून करण आहे, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, बांगलादेशातील युनूस सरकारने पुढील वर्षी फेब्रुवारीत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून अवामी लीगच्या राजकीय कारवायांवर बंदी घातली असून, मे २०२५ मध्ये पक्षाची नोंदणीही निलंबित केली आहे. या निर्णयावर हसीनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.