तमिळनाडू,
41 deaths Tamil Nadu गेल्या महिन्यात तमिळनाडूत अभिनेता विजयच्या प्रचारसभेत झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ४१ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर विजयने मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मात्र, मृतांपैकी एका व्यक्तीच्या पत्नीने विजयकडून मिळालेली आर्थिक मदत परत केली आहे, ज्यामुळे या प्रकरणात नवे वळण आले आहे.
शंकवी पेरुमल कोण आहे?
शंकवी पेरुमल असे मृत रमेश यांची पत्नीचे नाव आहे. शंकवीने विजयकडून मिळालेली मदत परत करताना सांगितले की, विजय करूरमध्ये तिच्या सांत्वनासाठी उपस्थित झाला नाही. “घरी येण्याऐवजी विजयने आम्हाला ममल्लापुरम येथील एका खाजगी रिसॉर्टमध्ये आमंत्रित केले. माझ्या पतीच्या बहिणीला विजयला भेटण्यासाठी नेले गेले, मात्र माझा पती विजयला पाहण्यासाठी सभेत गेला आणि त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर विजयने माझे सांत्वन करावे अशी मला अपेक्षा होती, पण तसे झाले नाही,” शंकवी पेरुमल यांनी सांगितले.त्यांनी पुढे आरोप केला की विजयच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा गैरवापर केला आणि त्यांच्या पतीच्या बहिणीला विजयला भेटण्यासाठी ममल्लापुरम नेले. रमेश यांच्या बहिणीचा विजयशी व्यक्तिगत संबंध नसताना ही भेट आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याउप्पर, अभिनेता विजयने चेन्नई येथे मृतांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे. ४१ मृतांपैकी ३७ कुटुंबीयांनी विजयला प्रत्यक्ष भेट दिली, तर उर्वरित काही कुटुंबिय विविध कारणास्तव चेन्नईला येऊ शकले नाहीत.दरम्यान, या प्रकरणाचा विशेष तपास करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. सेंथिलकुमार यांनी विशेष तपास पथकाकडून चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशाला तमिझगा वेत्री कळगम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.चेंगराचेंगरी प्रकरणी अद्याप अनेक प्रश्न उरले आहेत आणि मृतांच्या कुटुंबीयांमध्ये संताप आणि नाराजी वाढत असल्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.