मुंबई,
Deadline extended again for e-PIC inspection राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ई-पिक पाहणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहेत. आता शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत ई-पिक पाहणी पूर्ण करण्यासाठी वेळ मिळणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पाहणीदरम्यान केवळ ३६ टक्के पिकांची नोंदणी झाली होती. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही ई-पिक पाहणीपासून वंचित राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शासनाने ही मुदतवाढ दिली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पिक विमा, आणि पीक कर्ज यांसारख्या महत्त्वाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये.
ई-पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या अॅपद्वारे लॉगिन करून स्वतःच्या नावावरील जमिनीचा गट क्रमांक निवडावा लागेल. पिकांची माहिती जसे की पेरणीची तारीख, पिकाचे क्षेत्र इत्यादी काळजीपूर्वक भरावी लागते. आता अॅपमध्ये ५० मीटरच्या परिसरातून पिकाचा फोटो घेणे बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरून माहितीची अचूकता निश्चित होईल. एकदा माहिती “सेव्ह” केल्यावर ती आपोआप सातबारावर नोंदवली जाते, त्यामुळे शेतातील पिकांची नोंदणी अधिकृत स्वरूपात पूर्ण होते. राज्य सरकारकडून करण्यात आलेली ही मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.