सूरत,
son-pays-off-290-farmers-loans-surat “मेरा मुझ में कुछ नहीं, तेरा तुझको अर्पण...” या संत कबीरांच्या ओळी जशा अर्थपूर्ण वाटतात, तसाच त्यांचा खरा अर्थ जगासमोर आणणारा प्रसंग घडला आहे. गुजरातच्या सूरत शहरातून एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. सूरतमधील उद्योगपती बाबूभाई जिरावाला यांनी आपल्या आई संतोकबेन जिरावाला यांच्या इच्छेची पूर्तता करत आपल्या मूळ गावातील २९० शेतकऱ्यांचे कर्ज फेडून त्यांना कर्जमुक्त केले. आईच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी तब्बल ९० लाख रुपये दान केले आणि गावकऱ्यांना एक अमूल्य भेट दिली.

अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील जीरा या छोट्याशा गावात ही घटना घडली. या गावचे मूळ रहिवासी असलेले आणि सध्या सूरतमध्ये स्थायिक असलेले बाबूभाई जिरावाला यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील सर्व शेतकऱ्यांचे बँकेचे जुने कर्ज फेडून टाकले. या उदार उपक्रमामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावात सुमारे शंभर वर्षांपूर्वी सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आली होती. मात्र, १९९० च्या दशकात घोटाळ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नावावर चुकीची कर्जे दाखल करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणे थांबले आणि अनेक वर्षे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सूरतचे रिअल इस्टेट व्यावसायिक बाबूभाई यांनी आपल्या आईंच्या इच्छेप्रमाणे हे कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भावनगर बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व शेतकऱ्यांचे बकाया एकरकमी भरण्याची तयारी दर्शवली. बँकेने त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत केली. बाबूभाई जिरावाला म्हणाले, “आमच्या जीरा गावातील २९० शेतकऱ्यांचे १९९५ पासूनचे बँक कर्ज प्रलंबित होते. son-pays-off-290-farmers-loans-surat या कर्जामुळे बँकेकडून कोणालाही नव्याने कर्ज मिळत नव्हते. माझ्या आईची इच्छा होती की तिच्या दागिन्यांची विक्री करून गावासाठी काहीतरी चांगले करावे. म्हणून आम्ही दागिने विकून शेतकऱ्यांचे सर्व कर्ज फेडले.”
त्यांनी पुढे सांगितले की, “मी आणि माझ्या भावाने स्वतः बँकेत जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एकूण ९० लाख रुपयांचे बकाया कर्ज आम्ही भरले आणि बँकेकडून शेतकऱ्यांना ‘नो लोन सर्टिफिकेट’ मिळवून दिले. son-pays-off-290-farmers-loans-surat हे प्रमाणपत्र आम्ही गावात एका छोट्या समारंभात शेतकऱ्यांना सुपूर्द केले. आज माझ्या आईची इच्छा पूर्ण झाली आणि आम्हाला वाटतंय की तिला खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे.” बाबूभाईंच्या या कर्तृत्वाने केवळ गावकऱ्यांना दिलासा मिळाला नाही, तर समाजात एक सुंदर संदेशही दिला — आईची इच्छा पूर्ण करताना जर कोणाचं आयुष्य उजळत असेल, तर तीच खरी श्रद्धांजली.