नागपूर,
Air Traffic Nagpur : भारताचे हवाई क्षेत्र सध्या दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, मुंबई या चार शहरात विभागलेले आहे. चारही क्षेत्राचे एकत्रीकरण करून मध्यवर्ती नागपुरात इंडियन सिंगल स्काय हार्मोनाइज्ड एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट (ईशान ) या प्रकल्पाचे मुख्य केंद्र सुरु करण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स गिल्ड (इंडिया) च्या चर्चासत्रात दिली.
मध्यवर्ती नागपूर सर्वोत्तम
मुख्यत: नागपूरच्या विमानतळांवर एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे मुख्य केंद्र असा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) भारतीय विमानतळ प्राधिकरणाने तयार केला आहे. देशातील हवाई वाहतूक क्षेत्र नियंत्रित करण्यासाठी मध्यवर्ती नागपूर सर्वोत्तम असल्याचे नमुद केले आहे.
भारतातील चार उड्डाण माहिती क्षेत्रे एकाच ठिकाणी स्थापित करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला असल्याने केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय ’ईशान’ (इंडियन सिंगल स्काय हार्मोनाइज्ड एअर प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स गिल्ड (इंडिया) चे सरचिटणीस अलोक यादव यांनी दिली.
चारही हवाई क्षेत्राचे एकत्रीकरण
एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नागपूर हवाई वाहतूक नियंत्रणाचे अपग्रेड करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. हवाई वाहतूक व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी एप्रिल २०२४ मध्ये एअरपोर्ट अथॉरिटी इंडियाने प्रकल्प अहवाल तयार केला. चारही हवाई क्षेत्राचे एकत्रीकरण करून एकच हवाई क्षेत्र असावेत. जेणेकरुन एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्यात मदत होईल, हाच यामागील उद्देश आहे. इंडियन सिंगल स्काय हार्मोनाइज्ड एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट हा एक महत्त्वाकांक्षी सरकारी उपक्रम असून सध्याच्या एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणालीचे आधुनिकीकरण केल्या जाणार आहे. यामुळे हवाई व्यवस्थापन अधिक सुलभ आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास अलोक यादव यांनी व्यक्त केला.