दक्षिणेकडून उत्तरपर्यंत हवामानात उलथापालथ...कुठे थंडी तर कुठे पाऊस

01 Nov 2025 09:10:58
नवी दिल्ली,
Weather changes एकीकडे उत्तर भारतात थंडी दाखल झाली आहे. तर दुसरीकडे दक्षिण भारतात ‘मोंथा’ या चक्रीवादळाने भीषण कहर माजवला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सध्या हवामानात मोठा बदल जाणवत आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील भागात गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. सकाळ-संध्याकाळच्या गारव्यात वाढ झाली असून, नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच तापमानात घसरण नोंदवली जात आहे. दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद आणि गाझियाबाद या परिसरात पुढील काही दिवस आंशिक ढगाळ वातावरण राहील, अशी हवामान विभागाची शक्यता आहे.
 
  

Weather changes 
संग्रहित फोटो 
उत्तर प्रदेशातही हवामानाने अचानक कलाटणी घेतली आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील वाराणसी, प्रयागराज, मऊ यांसारख्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पश्चिम उत्तर प्रदेशात ढगाळ वातावरण राहणार आहे. अनेक भागांत वारे वेगाने वाहतील, त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. हिमालयाच्या कुशीत असलेल्या सिक्कीममध्ये मात्र परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. भारत-चीन सीमेजवळील नाथुला, कुपुप आणि त्सोम्गो (चांगू) तलाव परिसरात प्रचंड हिमवृष्टी होत आहे. तापमानात तीव्र घट झाली असून, हवामान विभागाने सिक्कीमसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बर्फामुळे रस्ते अडथळ्यांनी बंद झाले आहेत, त्यामुळे पर्यटकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
उत्तराखंडमध्ये सुद्धा थंडीने आपली पकड मजबूत केली आहे. देहरादून, हरिद्वार, ऋषिकेश आणि हल्द्वानीसारख्या ठिकाणी सकाळच्या थंडगार वाऱ्यांनी वातावरण गारठवले आहे. पर्वतीय भागात तापमान ८ ते १० अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. मात्र दुपारी सौम्य ऊन पडल्याने वातावरण आनंददायक राहील, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये चक्रीवादळ ‘मोंथा’ने मोठी हानी केली आहे. तेलंगणातील विविध भागांत मुसळधार पावसामुळे किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आंध्र प्रदेशात विद्युत यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली असून, सुमारे १३ हजार वीज खांब, तीन हजार किलोमीटर वीजवाहक तार आणि हजारो ट्रान्सफॉर्मर्स नुकसानग्रस्त झाले आहेत.
 
ओडिशा आणि बंगालमध्येसुद्धा ‘मोंथा’च्या संतापाचा फटका बसला आहे. जोरदार पाऊस, वादळी वारे आणि किनारपट्टी भागात आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. देशाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे हवामानाचे हे दोन टोकांचे चित्र आहे. एका बाजूला गुलाबी थंडीचा गारवा तर दुसऱ्या बाजूला चक्रीवादळाचा तडाखा भारतातील ऋतू परिवर्तनाचे वास्तव दर्शवत आहे.
Powered By Sangraha 9.0