रिसोड,
Fire in the cowshed here तालुक्यातील येवता येथे ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता भगवान गंगाराम भारती या शेतकर्याच्या गोठ्यात अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. या आगीत गोठ्यात ठेवलेला जनावरांचा चारा, शेतीसाठी वापरणारे स्प्रिंकलर पाइप, मोटर पंप, केबल, टिनपत्रे,कैरेट व विविध साहित्य जळून खाक झाले. या आगीत शेतकर्याचे एक वासरू मरण पावले असून, दोन बैले जवळपास ६० टक्के भाजले आहेत. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर रिसोड नगरपरिषद अग्निशमन दलाला कळविण्यात आले.

अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत सर्व साहित्य जळून नष्ट झाले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. आग लागताच सामाजिक कार्यकर्ते गजानन देशमुख यांनी रिसोड अग्निशामक दलाला फोन करून माहिती दिली. विनोद भांदुर्गे, बंडू भारती, पंकज भारती, सतीश भांदुर्गे विष्णू अवचार, पुरुषोत्तम भांदुर्गे, मनोज भारती, अमोल भारती व आदी ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सहकार्य केले.