उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत लॉजिस्टिक दर कमी करण्याचा प्रयत्न

15 Nov 2025 21:58:17
नागपूर, 
devendra-fadnavis : राज्य शासनाने उद्योगांसाठी पुरक असे लॉजिस्टिक धोरण आणले असून उद्योग क्षेत्रात उत्तम दळणवळच्या सोयी उपलब्ध करुन देत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. समृद्धी माहामार्गालगत वडगाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टीक पार्कचे भूमिपूजन व शिलान्यास करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. समीर मेघे, आशिष देशमुख, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगम, एक्सएसआयओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल, ब्लॅक स्टोन कंपनीचे तूहीन पारेख आदी यावेळी उपस्थित होते.
 
 
jlk
 
 
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध गुंतवणुकीसाठी एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत ३ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
 
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, एक्सएसआयओच्या माध्यमातून नागपूर शहराला देशाचे लॉजिस्टिक हब बनण्याच्या दिशेने गती मिळणार आहे. नागपूरला भौगोलिकदृष्ट्या झिरो माईल हे मध्य भारताचे केंद्र बिंदू म्हणून ब्रिटिशांनी घोषित केले होते. आता हे देशाचे लॉजिस्टिक हब होण्याच्या मार्गाने पुढे जात आहे. एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टीक पार्कच्या माध्यमातून या कार्यास गती मिळेल. नागपूर हे नागरी विमान क्षेत्रातही पुढे जात आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानांच्या फेर्‍या या शहरात दररोज होत आहे. समृद्धी महामार्गामुळे उद्योग क्षेत्रातील दळणवळास चालना मिळाली आहे.
 
७०० कोटी गुंतवणूकीचा लॉजिस्टिक पार्क
 
 
समृद्धी एक्सएसआयओ हा ७०० कोटी गुंतवणूकीचा लॉजिस्टिक पार्क हा जागतिक दर्जाचा पार्क उभारला आहे. आज १०५ एकरावरील दुसर्‍या टप्प्यातील ११०० कोटी गुंतवणूकीच्या उद्देशाने तयार करण्यात येणार्‍या लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन झाले आहे. या दोन्ही टप्प्यातून जवळपास १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. ही आनंदाची बाब असून उद्योग क्षेत्रातील वस्तूंना देशांतर्गत तसेच पोचविण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगत समृद्धी मार्गावरील इगतपुरी भागातून वाढवण बंदरापर्यंत जोडण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
५ हजार कोटींची गुंतवणूक करणार
 
 
उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी लॉजिस्टिकचा आणि ब्लॉकचेन ची सांगड घालून या क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने कार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले.एक्सएसआयओ ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याने राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान ठरेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यापूर्वी राज्य शासना सोबत ५ हजार कोटींचा सामंजस्य करार झाला आहे. आता राज्यातील गुंतवणुकीची ही रक्कम ३ हजार कोटींनी वाढून ८ हजार कोटी करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0