हिंगणघाट,
Charudatt Afle भारत मातेची पूजा करताना आपण आपसात कुचबूज करीत असु तर तुम्ही पापात जाल. देशाच्या सीमेवर तुमच्यासाठी डोळ्यात तेल टाकून लढणार्या सैनिकांचा विचार करा. भारत मातेच्या पुजेला तुम्ही कोवळ्या उन्हात बसताना कुजबूज करता. पाप पुण्याचा विचार करा, असे प्रबोधन प्रसिद्ध कीर्तनकार चारूदत्तबुआ आफळे यांनी केले.

स्थानिक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वंदे मातरम गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चारुदत्त आफळे बोलत होते.चारुदत्त आफळे महाराज यांनी विद्यार्थ्यांसमोर कीर्तनाच्या माध्यमातून वंदे मातरम गीताचा प्रेरणादायी जन्म इतिहास प्रभावीपणे उलगडला. आपल्या सहजसुंदर आणि चैतन्यमय कीर्तनातून आफळे महाराजांनी वंदे मातरम गीताचे रचयिता बंकीमचंद्र चॅटर्जी यांना हे अमर शब्द कसे सुचले. त्यामागील आध्यात्मिक व राष्ट्रभाव प्रेरणा काय होती याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. बंकिमचंद्र चॅटर्जी हे ब्रिटिश राजवटीत डिस्ट्रिट मॅजिस्ट्रेट असल्याने त्यांना क्रांतिकारक मातृभूमीसाठी कसे यातना सहन करायचे याची माहिती असायची. त्या सगळ्या बाबींचे चिंतन अभ्यास करून त्यांना त्यांच्या आनंदमठ कादंबरीसाठी हे गीत सुचले, असे सांगत या गीताचे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील अमूल्य योगदान असल्याचे ते म्हणाले.
संस्थेचे सचिव रमेश धारकर यांनी स्वतः संकलित केलेले मन करा रे प्रसन्न हे पुस्तक आफळे महाराज तसेच स्वरसंगत करणार्या कीर्तन मंडळीला भेट दिले. कार्यक्रमाची सुरुवात विद्या भारतीचे वार्षिक गीत समरसता का मानबिंदू यह... या गीताने झाली.कार्यक्रमाला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव रमेश धारकर, सहसचिव संजय देशपांडे, कार्यकारिणी सदस्य सुवर्णा देशपांडे, प्रधानाचार्यद्वय राजू कारवटकर व हरीश भट्टड, उपमुख्याध्यापकद्वय किशोर चवरे व किरण मद्दलवार, पर्यवेक्षिकाद्वय मनीषा कोंडावार व निलाक्षी बुरीले, पर्यवेक्षक ईश्वर चंदनखेडे, दोन्ही शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.संचालन रणदीप बिसने यांनीक केले प्रधानाचार्य राजू कारवटकर यांनी आभार मानले.