जयपूर,
Uncontrolled dumpers in Jaipur राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. लोहामंडी रोडवर एक अनियंत्रित डंपर तब्बल दहा वाहनांवर धडकला आणि जवळपास ५० जणांना चिरडलं. या दुर्घटनेत १९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  
 
घटनेची माहिती मिळताच हरमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात अफरातफरी माजली असून, मुख्य मार्गावरील वाहतूक पोलिसांनी तात्पुरती वळवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डंपरने प्रथम एका कारला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर अनियंत्रित होत पलटी झाला. या भीषण अपघातात काही लोक डंपरखाली दबले असल्याचं समजतं. या दरम्यान डंपरने कार, बाईकसह इतर अनेक वाहने उद्ध्वस्त केली.
 
 
  
गंभीर जखमींना एसएमएस रुग्णालयात दाखल केलं असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, फक्त एका दिवसापूर्वीच राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातही असाच भीषण अपघात झाला होता. फळोदी तालुक्यातील मतोड़ा भागात रोडकडेला उभ्या ट्रक-ट्रेलरमध्ये टेंपो ट्रॅव्हलरची धडक होऊन १५ जणांचा मृत्यू झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. हे सर्व श्रद्धाळू कोलायत दर्शनावरून जोधपूरला परतत असताना ही दुर्घटना घडली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जयपूरमधील या नव्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना तातडीने मदत व बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सतत घडणाऱ्या अशा भीषण अपघातांमुळे राजस्थानमधील रस्त्यांवरील सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेत.