चुराचंदपूर,
Four militants killed in Manipur मणिपूर राज्य पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेले आहे. चुराचंदपूर जिल्ह्यातील खानपी गावाजवळ आज सकाळी लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीत चार अतिरेकी ठार पडले. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण बंदी घातलेल्या युनायटेड कुकी नॅशनल आर्मी या संघटनेशी संबंधित होते.
सकाळी साडेपाचच्या सुमारास सुरक्षा दलांना या भागात काही अतिरेकी लपल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. दल जवळ पोहोचताच अतिरेक्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या जोरदार गोळीबारात चार अतिरेकी जागीच ठार झाले. या कारवाईदरम्यान काही अतिरेकी अंधाराच्या आडून पळून जाण्यात यशस्वी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठार झालेल्यांकडून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असून उरलेल्या अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी जंगल भाग पिंजऱ्यात घेतला आहे. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून शांततेसाठी अनेक कुकी आणि झोमी गटांनी केंद्र व राज्य सरकारसोबत तह केले आहेत. घटनेनंतर लष्कराने अधिकृत निवेदन जारी करत चकमकीचा तपशील दिला असून, परिसरात उच्चस्तरीय सतर्कता जारी करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण भागात सुरक्षा दलांचे कडक बंदोबस्त असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.