अभिषेक शर्माची नजर कोहलीच्या विक्रमावर!

05 Nov 2025 13:41:46
नवी दिल्ली,
Abhishek Sharma and Kohli भारतीय संघाचा तरुण सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. मालिकेतील तीन सामने पार पडले असून अभिषेकने आतापर्यंतच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याच्याकडे एक मोठी संधी आहे. विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांत अभिषेक शर्माने एकूण ११२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३७.३३ असून स्ट्राईक रेट तब्बल १६७.१६ इतका आहे. या मालिकेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आता चौथ्या सामन्यात त्याच्यासमोर विराट कोहलीच्या एका विशेष विक्रमाची बरोबरी करण्याचे आव्हान आहे.
 
 
Abhishek Sharma and Kohli
 
विराट कोहलीने भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १,००० धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्यासाठी त्याने २७ डाव घेतले होते. अभिषेक शर्माच्या आकडेवारीकडे पाहिल्यास, त्याने आतापर्यंत २६ डावांमध्ये ९६१ धावा केल्या आहेत. म्हणजेच तो फक्त ३९ धावांवरून १,००० धावांच्या टप्प्याला पोहोचेल. जर तो चौथ्या सामन्यात ३९ धावा काढण्यात यशस्वी झाला, तर तो विराटच्या या विक्रमाशी बरोबरी साधेल.
 
अभिषेकला मागील सामन्यात कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी होती, परंतु ती त्याच्याकडून हातची गेली. आता पुन्हा एकदा त्याच्यासमोर सुवर्णसंधी आहे. सध्याच्या फॉर्मनुसार त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा ठेवली जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० सामना ६ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. मालिका सध्या बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक ठरणार आहे. अभिषेकसाठी हा सामना वैयक्तिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे. जर त्याने विराट कोहलीची बरोबरी साधली, तर तो भारतीय टी-२० संघातील सर्वात आशादायी तरुण फलंदाज म्हणून आपली ओळख अधिक ठळकपणे निर्माण करेल. क्रिकेटप्रेमींच्या नजरा आता त्याच्या या विक्रमशोधावर खिळल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0