बिजापूर ,
Naxal killed in Bijapur छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरच्या घनदाट जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरु आहे. या धक्कादायक कारवायात आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. वृत्तानुसार, ही चकमक बिजापूर जिल्ह्यातील तारलागुडा परिसरातील अन्नाराम व मरीमल्ला जंगलात घडत आहे. नक्षलवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक शोध मोहिमेसाठी रवाना झाले होते. त्यावेळी दबा धरलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, तर जवानांनीही प्रत्युत्तर दिले.
चकमकीच्या ठिकाणाहून काही शस्त्रे आणि नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. दाट जंगल आणि कठीण भूभागामुळे ऑपरेशन सैनिकांसाठी अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चकमक संपल्यानंतर जखमी किंवा फरार नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशन सुरू राहील.
सुरक्षा दल आणि पोलिसांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्र सरकारचा दावा आहे की मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपेल. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्रितपणे नक्षलवादविरोधी मोहिम राबवत आहेत. गेल्या वर्षभरात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर जोरदार कारवाई केली आहे. दरम्यान, राज्य सरकार नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरण २०२५ आणि ‘नियाद नेल्ला नर’ योजना राबवत आहे. या योजनेतून नक्षलवादी समाजात परत येतील, सामान्य जीवन जगतील आणि समाजाशी मिसळतील, अशी अपेक्षा आहे.