सेलू,
Nagpur Tuljapur underpass danger येथील विश्रामगृह ते बेलगावकडे जाणार्या नागरिकांसाठी नागपूर—तुळजापूर अंडर बायपास मार्ग धोकादायक ठरत आहे. दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी व जड वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर असते. मूलभूत सुविधांचा अभाव, खराब रस्ता, अपुरी प्रकाश व्यवस्था व वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे प्रवास अक्षरशः जीवावर बेतत आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी अंडर बायपास परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, रस्त्यावरील साचलेले पाणी, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि वेगात जाणारी अवजड वाहने यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. अनेक वेळा किरकोळ व गंभीर अपघात होऊनही संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची तीव्र नाराजी नागरिकांत व्यक्त होत आहे.
विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक तसेच दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणारे कामगार यांना या मार्गावरून जाताना भीतीच्या छायेत प्रवास करावा लागत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.संबंधीत विभागाने नागपूर—तुळजापूर अंडर बायपासची दुरुस्ती, योग्य प्रकाश व्यवस्था, स्पष्ट दिशादर्शक फलक, वेगमर्यादा नियंत्रण व अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.