मेळघाटातील आदिवासी बांधवांची संसदवारी खासदार वानखडे यांचा स्तुत्य उपक्रम

17 Dec 2025 10:02:51
अमरावती,
mp wankhade ज्यांनी आजवर आपल्या गावाची वेस कधी ओलांडली नाही, अशा संपूर्ण मेळघाटातील कानाकोपर्‍यातून आणि प्रत्येक गावातून आलेल्या आदिवासी बांधवांनी थेट देशाची राजधानी गाठून ऐतिहासिक संसद भवनाला भेट दिली. अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आणि माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या अभिनव संकल्पनेतून मेळघाटातील या बांधवांचे ’संसद दर्शन’ घडले. मेळघाट हा निसर्गरम्य असला तरी अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथील अनेक नागरिक आजही बाहेरील जगापासून अलिप्त आहेत. अशा परिस्थितीत या बांधवांना देशाच्या लोकशाहीचे मंदिर पाहता यावे आणि जगाशी त्यांचा संपर्क वाढावा, यासाठी खा. वानखडे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मेळघाटातील प्रत्येक गावातील नागरिक थेट नवी दिल्लीतील संसद भवनात पोहोचले.
 
 
 
 
मेळघाट आदिवासी
 
 
प्रियंका वढेरा यांच्याशी संवाद
या विशेष दौर्‍याचे मुख्य आकर्षण म्हणजे, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार प्रियंका वढेरा आणि संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याशी झालेली भेट. खा. वानखडे यांनी या बड्या नेत्यांशी आदिवासी बांधवांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली. यावेळी आदिवासी बांधवांनी आपले गार्‍हाणे आणि प्रेम या नेत्यांसमोर व्यक्त केले. इतक्या मोठ्या नेत्यांना समोर पाहून आणि भव्य संसद भवन पाहून उपस्थितांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळाले.
 
सांघिक प्रयत्नातून संकल्पना पूर्ण
ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी राज्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि चिखलदरा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले.mp wankhade हा उपक्रम केवळ एक सहल नसून, दुर्गम भागातील जनतेला देशाच्या सर्वोच्च सभागृहाची ओळख करून देणारा एक उपक्रम ठरला आहे. या ऐतिहासिक दौर्‍यात दयाराम काळे, सहदेव बेलकर, राहुल येवले, मेहपतसिंग उईके, संजय बेलकर, राजेश सेमलकर, पियुष मालवीय, नानकराम ठाकरे, तोताराम कास्देकर, सोनाजी कास्देकर, शिकारी बेठेकर अन्य उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0