नवी दिल्ली,
modi in house vande mataram लोकसभेत ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या विशेष चर्चेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने झाली. या प्रसंगी त्यांनी ब्रिटिशांच्या काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमीची आठवण करून देत सांगितले की, वंदे मातरम् या नाऱ्याने भारताचे विभाजन रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिशांना भारतात दीर्घकाळ सत्ता टिकवणे कठीण होणार आहे हे जाणवले होते. त्यामुळेच त्यांनी ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती स्वीकारली आणि त्यासाठी बंगालला प्रयोगशाळा बनवले. त्या काळात बंगालची वैचारिक शक्ती देशाला दिशा देत होती, प्रेरणा देत होती आणि राष्ट्रीय एकतेचा केंद्रबिंदू होती. म्हणूनच ब्रिटिशांचे मत होते की जर बंगाल फोडला, तर संपूर्ण देश तुटेल.
१९०५ मध्ये बंगालचे विभाजन करताना ब्रिटिशांनी हाच डाव आखला होता. परंतु या वेळी वंदे मातरम् या घोषणेतून उठलेल्या राष्ट्रीय स्वाभिमानाच्या लाटेने ब्रिटिशांच्या योजनांना जोरदार धक्का दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ब्रिटिशांनी केलेल्या या मोठ्या पापाच्या विरोधात वंदे मातरम् खडकाप्रमाणे उभे राहिले आणि राष्ट्रीय एकता बळकट केली. लोकसभेत या विषयावर १० तासांची विशेष चर्चा निर्धारित करण्यात आली आहे. तर मंगळवारी राज्यसभेत राष्ट्रगीतावर चर्चा होणार असून तिची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करतील.