अग्रलेख
Sahitya Sammelan-Marathi 2025 साधारणतः सालाबादाप्रमाणे पार पडणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदाही प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात आले. उद्घाटनाच्या सोहळ्यात अध्यक्षांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या प्रथेप्रमाणे सरकारला चार खडे बोल सुनावले. त्याच अपेक्षेने अध्यक्षांच्या भाषणाकडे उत्सुकतेने कान लावलेल्या अनेक साहित्य रसिकांनी त्याची प्रथेप्रमाणे वाहवा केली आणि आयोजित कार्यक्रमांचे सोहळे आटोपून प्रथेप्रमाणेच गाजलेल्या संमेलनाचे सूपदेखील वाजले. गाजणे आणि सूप वाजणे या ज्या दोन बाबी साहित्य संमेलनाकडून सालाबादेस अपेक्षित असतात, तसे यंदाच्या दिल्ली साहित्य संमेलनातही घडले. Sahitya Sammelan-Marathi 2025 हा सोहळा म्हणजे साहित्य शारदेचा उत्सव असतो वगैरे बोलले जात असले, तरी अलिकडच्या साहित्य संमेलनांचे एकंदर रूप पाहता, त्यास साहित्य संमेलन तरी का म्हणावे, असा प्रश्न संमेलनांचा उपचार पार पडल्यानंतर अनेकांना पडत असतो. तसा तो यंदाही पडला. संमेलनाच्या उद्घाटन सत्रातील अध्यक्षांच्या भाषणात सरकारच्या नावाने किंवा सत्ताधाऱ्यांच्या दिशेने वाक्बाण सोडणे म्हणजे संमेलनातील जाणिवांच्या जिवंतपणाचे लक्षण असते, अशी समजूत अलिकडे रुजली असल्याने, तसे केले नाही तर संमेलन सपक झाले की काय, असे अनेकांस वाटू लागते.
Sahitya Sammelan-Marathi 2025 कदाचित अध्यक्षपदाच्या खुर्चीतून काही सनसनाटी बोलल्यानंतरच अशी व्यक्ती चर्चेचा विषय होऊन प्रसिद्धीच्या झोतात येत असावी, असा समज रूढ होऊ लागल्याने अध्यक्षांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैर वापर करून अधिकारपदाचा प्रच्छन्न उपभोग घेत इतरांस खडे बोल सुनावण्याचा मोठेपणा गाजवावा, अशीच अनेकांची अपेक्षा असावी. त्या अर्थाने पाहता दिल्लीत पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीपासून त्याचे सूप वाजेपर्यंत, म्हणजे समारोपाच्या सोहळ्यापर्यंत प्रत्येक घडामोडीची माध्यमांमध्ये, साहित्य विश्वात आणि मराठी माणसांच्या जगात बऱ्यापैकी चर्चा होत असल्याने यंदाचे हे साहित्य संमेलन यशस्वी झाले, असे मानणाऱ्यांची संख्या मोठी असेल, यात शंका नाही. Sahitya Sammelan-Marathi 2025 यंदाच्या साहित्य संमेलनाध्यक्षा ताराबाई भवाळकर यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर समाजातील काही गटतट, समाजमाध्यमे आणि माध्यम क्षेत्रातील काही कंपूमध्ये उमटणाऱ्या प्रतिक्रिया पाहता, साहित्य संमेलन अपेक्षेप्रमाणेच यशस्वी झाल्याचा निःसंदिग्ध निर्वाळा देण्यात हयगय करण्याचे काहीच कारण नाही. या संमेलनास सरकारी पक्षाने सर्वतोपरी मदतीचे हात सैल सोडले होते.
साहित्य शारदेचा हा सोहळा ऐतिहासिक ठरावा यासाठी पुण्याहून एका विशेष रेल्वेगाडीची विशेष सुविधा उपलब्ध करून देऊन सरकारने भाषाप्रेमींच्या साहित्यास्वादाची भूक शमविण्याची सोय केली होती. केवळ दीड हजारांचे नोंदणी शुल्क भरून या विशेष रेल्वेगाडीने दिल्लीपर्यंत जाण्या-येण्याची सुविधा असल्याने मराठी भाषाप्रेमींनी या संधीचा लाभ घेतल्यामुळे या उपक्रमास चांगला पाठिंबाही लाभला होता. Sahitya Sammelan-Marathi 2025 साहजिकच या मंचावरून साहित्यविश्वाच्या भवितव्याची उठाठेव होईल, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने प्रतिष्ठा उंचावलेल्या मराठी भाषेतील समृद्ध साहित्यविश्वाची परंपरा अधिक संपन्न करण्यासाठी साहित्य क्षेत्राचे योगदान काय असावे यावर चर्चासत्रे झडून काही ठोस निर्णय वगैरे होतील, साहित्य क्षेत्रासमोरील समस्यांची चर्चा होऊन या क्षेत्रातील नव्या पिढीसाठी निर्भेळपणे पायघड्या घातल्या जातील, अशा काही अपेक्षा घेऊन अनेकजण या संमेलनात सहभागी झाले होते. प्रत्यक्षात तीन दिवसांच्या या सोहळ्यात झोडपण्याचाच एककलमी कार्यक्रम यच्चयावतपणे राबविण्यासाठी अनेक जण सरसावल्याचे दृश्य पाहून या अपेक्षावंतांची निराशादेखील झाली असेल.
Sahitya Sammelan-Marathi 2025 पण असे होणे म्हणजेच संमेलनाचे यश आहे, असे मानणाऱ्यांची मक्तेदारी प्रस्थापित झालेली असल्याने या अपेक्षा उघड न करताच, नाराजीचे आपले सूर लपवून सुरू असलेल्या सुरात सूर मिसळण्यातील शहाणपण ओळखत या रसिकांनी सवलतीत मिळालेल्या गाडीतून परतीचा प्रवास पार पाडला असावा. एरवी राजकारणाच्या आखाड्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या चिखलफेकीच्या खेळास आणि त्यामधील कुरघोडीच्या डावपेचांस महाराष्ट्र मनापासून वैतागलेला असल्याने, त्यापासून थोडा विरंगुळा मिळावा आणि निखळ साहित्यविश्वाचे प्रतिबिंब पाहता यावे या अपेक्षेने मंडपात हजेरी लावणाऱ्यांना तसा काही अनुभव आला का, हे आता तपासावेच लागणार आहे. Sahitya Sammelan-Marathi 2025 जो खेळ सतत राजकारणाच्या रगाड्यात सुरू असतो, एकमेकांवर प्रच्छन्न चिखलफेक करून जनतेस नको असतानाही तो खेळ पाहण्यास भाग पाडले जाते, त्याच खेळासाठी साहित्य संमेलनासारख्या मंचाचा वापर व्हावा व राजकारण्यासोबत साहित्यिक म्हणून ओळख असलेल्यांनीही त्यामध्ये आपल्या सहभागाची नोंद करावी, हे अलिकडे साहित्य संमेलनांत कमी-अधिक प्रमाणात दिसून आले आहे.
तसे करू नये असे वाटत असतानाही अनेकांस त्या मोहापासून दूर राहणे जमलेले नाही, हे गेल्या वर्षीच्या अमळनेर साहित्य संमेलनातही दिसून आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षीय मंचावरून सरकारला खडे बोल सुनावणे ही फॅशन ठरणार असेल, तर मी त्या वाटेला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गेल्या वर्षी संमेलनाच्या जेमतेम सहा महिने अगोदर 97 व्या साहित्य संमेलनाचे नियुक्त अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी जाहीरपणे घेतल्याने, संमेलनांची बिघडत गेलेली घडी पूर्वपदावर येण्याच्या रसिकांच्या अपेक्षा गेल्या वर्षीच उंचावल्या होत्या. Sahitya Sammelan-Marathi 2025 पण सहा महिन्यांतच ते बोल हवेत विरले आणि रवींद्र शोभणे यांनीही प्रथेस शोभेल असेच भाषण करून सरकारला खडे बोल सुनावले होते. तसे झाले नसते, तर संमेलन सपक झाल्याचा ठपका कदाचित टाळता आला नसता. यंदाच्या संमेलनात सरकारला खडे बोल सुनावण्याची जबाबदारी नव्या अध्यक्षांना घ्यावीच लागणार हेही ठरलेलेच असल्याने, ताराबाई भवाळकर यांनी ती जबाबदारी चोखपणे पार पाडून अध्यक्षपदाच्या परंपरेस न्याय दिला, असेच म्हणावे लागेल. आपल्या भाषणात पंतप्रधानांच्या नावाचा चुकूनही उल्लेख होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेखही करण्याची वेळ येणार नाही, अशी जणू दक्षता घेत सरकारला मारल्या गेलेल्या कोपरखळ्यांनी त्यांच्याकडे अपेक्षेने पाहणाऱ्यांना प्रचंड गुदगुल्या झाल्या असतील, तर तेदेखील अपेक्षेप्रमाणेच घडले, असे म्हणावे लागेल.
Sahitya Sammelan-Marathi 2025 एकदा संमेलनाच्या मंचावरून राजकारणाचे सारे खेळ खेळावयाचे ठरले आणि साहित्य क्षेत्रही त्यात सहभाग दाखविण्यास उत्सुक आहे, असे संकेत मिळू लागले, तर याच मंचावर हजेरी लावणाऱ्या राजकारण्यांनी मागे राहणे हा मोठाच विनोद ठरला असता. या मंचावरून कलगीतुरा झडावा, तसे झाले तर संमेलन गाजेल आणि सुरुवातीपासूनच सुरू झालेले संमेलनाचे नगारे सूप वाजतानाही अधिक जोराने घुमतील असेच पार पडावे, अशी नियतीची अपेक्षा असावी. अध्यक्षांनी आपल्या भाषणात सरकारला खडे बोल सुनावले, कोपरखळ्या मारल्या, हे पाहून मंचावर उपस्थित असलेल्यांमधील राजकारण उफाळून येणे अनपेक्षित ठरले नसते. Sahitya Sammelan-Marathi 2025 विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संधीचा नेमका फायदा घेत, राजकीय गौप्यस्फोटांची जी काही माळ लावली, ते पाहता, राजकारणातील सर्वांत मोठे धमाके घडविण्याचे पुण्यदेखील साहित्य संमेलनांच्या नावावर जमा झाले आहे. राजकारणात भवितव्य घडविण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी कालपरवापर्यंत काही बाबी कुजबुजत्या सुरात कानात बोलल्या जात असत.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने, याच मंचावरून त्यास वाचा फुटल्याने आता पुढच्या काळात राजकारणाच्या मंचावर जी काही वादळे उठणार आहेत, ते पाहता, संमेलनांचे आयोजन अगदीच व्यर्थ जात नसावे, असेही अनेकांस वाटू शकते. साहित्यविश्वाचा सोहळा म्हणून आयोजित करावयाच्या अशा संमेलनांतून काहीतरी ठोस पुढे यावे, अशी अनेकांची अपेक्षा असते. काही वेळा ते काहीतरी म्हणजे नेमके काय असावे, हे मात्र कोणासच सांगता येत नाही. Sahitya Sammelan-Marathi 2025 यंदाच्या संमेलनाने या काहीतरीची उकल करून टाकली आहे. संमेलनाध्यक्षपदापासून राजकारणातील पदापर्यंतच्या अनेक संधींचे दरवाजे कोठे उघडतात, याची छुपी चर्चा आता उघडपणे सुरू व्हावी, हे संमेलनाचे सर्वांत मोठे फलित आहे. त्याचे पडसाद शंभराव्या संमेलनापर्यंत केवळ साहित्यविश्वात नव्हे, तर समाजजीवनातही उमटत राहतील, यात शंका नाही.